टीईटी पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेला हादरा; विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह! ,  परीक्षा पुढे ढकलल्याने शिक्षक उमेदवारांमध्ये संताप व निराशा; पारदर्शक, सुरक्षित परीक्षा व्यवस्थेची वाढती मागणी • ‘दोषींवर कठोर कारवाई करा’, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकमुखी सूर
1 min read

टीईटी पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेला हादरा; विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह! , परीक्षा पुढे ढकलल्याने शिक्षक उमेदवारांमध्ये संताप व निराशा; पारदर्शक, सुरक्षित परीक्षा व्यवस्थेची वाढती मागणी • ‘दोषींवर कठोर कारवाई करा’, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकमुखी सूर

Loading

टीईटी पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेला हादरा; विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह!

परीक्षा पुढे ढकलल्याने शिक्षक उमेदवारांमध्ये संताप व निराशा; पारदर्शक, सुरक्षित परीक्षा व्यवस्थेची वाढती मागणी • ‘दोषींवर कठोर कारवाई करा’, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकमुखी सूर

अमळनेर प्रतिनिधी :
राज्यातील पेपरफुटीचा शाप आता थेट शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर उठला आहे. वारंवार प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षक उमेदवारांच्याही भविष्याशी खेळ सुरू झाला असून, टीईटी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलावी लागल्याने लाखो उमेदवारांच्या स्वप्नांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. परीक्षा व्यवस्थेतील ढिसाळ कारभार, सुरक्षा यंत्रणेचे अपयश आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस ढासळत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र होत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘दैनिक महाराष्ट्र सारथी’ शी संवाद साधताना मुख्याध्यापक, शिक्षक, राजकीय पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत शासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. त्यांच्या निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया (विवेचनासह):
१)
“केंद्र आणि राज्य शासनाची नीतिमत्ताच फुटली आहे; तेथे पेपर काय, देशच फुटण्याची वेळ येईल का, अशी भीती निर्माण झाली आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील (अमळनेर) यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, पेपरफुटीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे आणि शासनावरील जनतेचा विश्वासही कमी होत आहे. परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि कठोर कारवाईचा अभाव ही चिंतेची बाब असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून अशी प्रकरणे कायमची थांबविणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असून, ती प्रभावीपणे पार पाडली गेली पाहिजे.

मा. आमदार डॉ बी एस. पाटील अमळनेर

२)”टीईटी परीक्षेचा पेपर २४ तास आधी फुटणे ही केवळ परीक्षा व्यवस्थेची चूक नसून विद्यार्थ्यांच्या विश्वासावर झालेला घाव आहे. पेपरफुटीसारख्या प्रकारांवर कठोर आणि तातडीची कारवाई झाली नाही, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टांचे मोल कमी होत जाईल. शासनाने दोषींना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा करून परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा.”

– मा. एस. डी. देशमुख
सेवानिवृत्त मुख्याध्यापक, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय

४)
खाजगीकरणाच्या नादात संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील परीक्षा पद्धतीवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे या पेपर फुटी ला जबाबदार कंत्राटी पद्धतीने भरलेले कर्मचारी व विविध खाजगी आयटी कंपन्या त्यांची सेवा सरकारी विभाग स्वीकारतात आणि त्यातून असे बेजवाबदारपणाची कृत्य घडते या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन समजुतीच्या नोटिसा दिल्या जात नाहीत त्यांच्यावर चौकशी समिती नेमून चौकशी होत नाही त्या चौकशीतून कोण दोषी हे निष्पन्न केल्या जात नाही आणि त्यातून दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्यांना दंड आकारण किंवा शिक्षा ठोठावली जात नसल्याने अत्यंत बेफिकिरेने गैर मार्गाने पैसा कमावण्याच्या नादात यात पेपर सीटर सामील होतात छपाई करणारी यंत्रणा सामील होते किंवा ज्या आयटी कंपनीचे सेवा पुरवठादार असतात ते यातून पळवाटा शोधून परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न अनाठायी रक्कम वसूल करून संबंधित गैरमार्गाने परीक्षा पास होणाऱ्या पर्यंत पोहोचवितात याकरिता सरकारी कर्मचारी हा पूर्ण वेळ कर्मचारी असावा त्याला सर्व सेवा सुविधांनी युक्त जीवन जगता येईल असे सरकारी संरक्षण असावे तसेच सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा सरकारने अद्यावत कराव्यात जेणेकरून अशा पेपर फुटीने हैराण पीडित लोक आत्महत्या करणार नाहीत योग्य प्रकारची गुणवत्ता तपासली जाईल आणि कुशल कर्मचारी सरकारी यंत्रणेला वापरायला मिळतील मात्र यासाठी हवी सरकारला चांगले करण्याची सद्बुद्धी कारण सध्या सरकारचे चालक मालक फक्त गैरप्रकाराने लोकसभेत विधानसभेत संख्याबळ वाढविण्याच्या नादात आपल्याला नागरिकांनी ज्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्याचीच आठवण त्यांना राहत नाही व लोकहिताचे कामे लोककल्याणकारी योजना याकरिता लोकप्रतिनिधी वेळ काढत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या पेपर फुटीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे

मा.संदीप घोरपडे
जिल्हासरचिटणीस- काँग्रेस पक्ष जळगाव

४)
“टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र मानसिक तणाव निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२८ पर्यंत मुदत दिली असली, तरी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेल्यास त्या मुदतीचे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. शालार्थ आयडीधारक शिक्षकांसाठी वर्षातून किमान दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि प्रभावी नियोजन ही शासनाची जबाबदारी आहे.”

मा. प्रकाश भिका पाटील (मुख्याध्यापक, मंगरूळ माध्यमिक विद्यालय)

५)
“टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागणे ही शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचा सर्वाधिक फटका प्रामाणिक शिक्षक उमेदवारांना बसत आहे. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात पेपरफुटीला कायमचा आळा घालावा आणि पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह परीक्षा प्रक्रिया राबवावी.”

शरद भिका पाटील (उपशिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर)
६)
“टीईटी प्रश्नपत्रिका फुटणे ही लाखो शिक्षक उमेदवारांच्या विश्वासाशी आणि भविष्याशी केलेली गंभीर प्रतारणा आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतेही अभय मिळता कामा नये. परीक्षा व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत; अन्यथा NSUI शिक्षक व विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल.”

अँड. कौस्तुभ सुनील पाटील
(जिल्हाध्यक्ष, NSUI जळगाव)

७)
“पेपरफुटी ही केवळ परीक्षा नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर झालेला घाव आहे. आधीच विविध शासकीय व अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांवर ताण असताना, अभ्यासासाठी घेतलेल्या मेहनतीवर पेपरफुटीने पाणी फेरले आहे. शासनाने या प्रकरणाची कठोर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच या घटनेमुळे मानसिक व शैक्षणिक नुकसान झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे.”

— डी. ए. धनगर
शिक्षक, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेर
अध्यक्ष, गणित मंडळ, अमळनेर तालुका

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *