दिव्यांग सेवेला संतांचा आशीर्वाद; ह.भ.प. प्रसाद महाराजांची स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयास सदिच्छा भेट
![]()
दिव्यांग सेवेला संतांचा आशीर्वाद; ह.भ.प. प्रसाद महाराजांची स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयास सदिच्छा भेट
विद्यालयातील सुविधा, शीघ्र निदान केंद्र, फिजिओथेरपी विभाग व निवासी व्यवस्थेची पाहणी; डॉ. भगवानजी तलवारे यांच्या कार्याचे कौतुक, समाजोपयोगी उपक्रमाला शुभाशीर्वाद
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाला संत सखाराम महाराज गादी पुरुष तथा परमपूज्यनीय ह.भ.प. श्री. प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी शनिवार, दि. २७ जून रोजी सदिच्छा भेट देत विद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधा आणि संस्थेच्या सेवाभावी कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक करत या उपक्रमाला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी विद्यालयातील शीघ्र निदान व हस्तक्षेप केंद्र, फिजिओथेरपी विभाग, निवासी व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या भौतिक सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था राबवत असलेल्या उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली आणि या सेवाकार्यातील समर्पणाची प्रशंसा केली.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. भगवानजी तलवारे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, पुनर्वसन आणि स्वावलंबनासाठी उभारलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करत, अमळनेरसारख्या ठिकाणी अशा स्वरूपाची समाजोपयोगी संस्था उभी राहणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या सेवाकार्यात सातत्याने प्रगती व्हावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्था समन्वयक ऋषिकेश जाधव यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, पुनर्वसनात्मक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती सादर केली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
संत सखाराम महाराज संस्थानची आध्यात्मिक परंपरा निष्ठेने पुढे नेत असतानाच समाजसेवा आणि मानवकल्याणाची भावना जपणारे ह.भ.प. श्री. प्रसाद महाराज यांचे प्रेरणादायी कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरत असून, त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.


