के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न*
जळगाव दि. १९/०६/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव व रेडिओ मनभावन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानसंपदा वाढावी, भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, चिकित्सक विचारसरणी जोपासली जावी तसेच पुस्तकांशी मैत्री निर्माण होऊन वाचन संस्कृती अधिक बळकट व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. गोविंद देशपांडे, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे (समन्वयक, कान्ह ललित कला केंद्र), श्री. अमोल देशमुख (संचालक, रेडिओ मनभावन) तसेच आर. जे. शुभांगी बडगुजर (रेडीओ मनभावन ) उपस्थित होते.
पी. एन. पणीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ साजऱ्या करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वाचन दिवसाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. केरळमध्ये ग्रंथालय चळवळ उभारून वाचन संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या पणीकर यांनी दिलेला “पढो और बढो” हा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने करण्यात आली.
यावेळी शाळेला एन्सायक्लोपीडियाचे सर्व भाग भेट देणारे ॲड. गोविंद देशपांडे तसेच रेडिओ मनभावनचे संचालक श्री. अमोल देशमुख, कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, आर.जे.शुभांगी बडगुजर यांचा पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमोल देशमुख यांनी केले. त्यांनी वाचनाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील पुस्तकांचे स्थान याविषयी विचार मांडले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी चिंगी या पुस्तकाचे अभिवाचन सादर केले. कु. स्पृहा साळुंके, कु. वैष्णवी पाटील, कु. अनुश्री चौधरी, सुमित पाटील, शाश्वत कुलकर्णी आणि कौस्तुभ खैरनार या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांतील निवडक उतारे प्रभावीपणे सादर केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण अभिवाचनाने उपस्थितांची दाद मिळवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन, आकलन व अभिव्यक्ती कौशल्यांना चालना मिळाली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित वाचनाची सवय ही यशस्वी जीवनाचा पाया असल्याचे सांगितले. पुस्तकांच्या सहवासातून ज्ञान, संस्कार, मूल्ये आणि व्यापक दृष्टिकोन प्राप्त होतो. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असून प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज काही वेळ वाचनासाठी दिला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. तसेच वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, भाषाशैली, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होते, असेही सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण सेविका रत्नमाला शिंदे यांनी तर
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. निर्मल चतुर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे , जेष्ठ शिक्षिका प्रतिभा लोहार , ग्रंथपाल रोशनी कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मोठी मदत झाली. पुस्तकांविषयी प्रेम, ज्ञानार्जनाची प्रेरणा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

