बोरी नदीत स्वच्छतेची लाट : प्लास्टिकमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम; तासाभरात ट्रॉलीभर प्लास्टिक संकलन
![]()
बोरी नदीत स्वच्छतेची लाट : प्लास्टिकमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम; तासाभरात ट्रॉलीभर प्लास्टिक संकलन
अमळनेर (प्रतिनिधी) : श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ६ वाजता बोरी नदी पात्रात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला स्वयंसेवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात शीतपेयांच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, गुटखा रॅपर्स, सौंदर्यप्रसाधनांचे प्लास्टिक आवरण तसेच खेळण्यांचे प्लास्टिक यांचा साठा झालेला दिसून आला. केवळ एका तासात तब्बल तीन घंटागाड्या भरतील इतके प्लास्टिक गोळा करण्यात आले, ही बाब चिंताजनक असल्याचे स्वयंसेवकांनी नमूद केले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना, “अशाच प्रकारे प्लास्टिकचा बेफाम वापर सुरू राहिल्यास भविष्यात गंभीर पर्यावरणीय व आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. बोरी नदीसारखी जीवनदायिनी नदी प्रदूषित होऊन जमीन नापीक होण्यासोबतच कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे,” असा इशारा देण्यात आला. सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळून नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या डस्टबिनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. डी. जाधव, प्रा. डॉ. पराग पाटील, डॉ. मांटे, उपप्राचार्य अमृत अग्रवाल, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. दिलीप राठोड, डॉ. राजपूत, डॉ. सावळे, प्रा. डॉ. सतीश पारधी, डॉ. वाघमारे, प्रा. डॉ. खेडकर, डॉ. तोंडे, डॉ. पवन पाटील, डॉ. आय. एस. पाटील, प्रा. डॉ. नलिनी पाटील, डॉ. अनिल महाले, महेश माळी, प्रशांत वंजारी यांच्यासह विविध महाविद्यालयांतील कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
तसेच महिला योगा ग्रुप व अमळनेर महिला मंचाच्या सदस्यांसह नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली.

