साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! , विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास
![]()
साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा!
विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास
अमळनेर प्रतिनिधी : साहित्यिक विचारांची उंची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या ‘प्रखर जनसंवाद’ या नव्या वृत्तपत्राला साहित्यिक मित्र परिवाराकडून उत्स्फूर्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आकर्षक मांडणी, सुसंगत विषयांची निवड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी भूमिका यामुळे ‘प्रखर जनसंवाद’ हे वृत्तपत्र वाचकांच्या मनात लवकरच घर करेल, असा ठाम विश्वास साहित्यिकांनी व्यक्त केला.
या वेळी बोलतांना साहित्यिक मंडळींनी सांगितले की, “प्रखर जनसंवाद” हे केवळ वृत्तपत्र नसून एक सशक्त विचारपीठ आहे, जे समाजातील विविध स्तरांतील भावना आणि वास्तव मांडण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. पूर्वीपासूनच ‘मराठी लाईव्ह न्यूज’ या डिजिटल माध्यमाने शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील बातम्यांना वेळेवर व न्याय्य प्रसिद्धी दिली असून, आता ‘प्रखर जनसंवाद’च्या रूपाने या कार्याला अधिक व्यापक दिशा मिळाली आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ‘प्रखर जनसंवाद’चे संपादक ईश्वर महाजन यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेतली व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच साहित्यिकांना एक सक्षम आणि अभिव्यक्तीशील विचारपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
प्रखर जनसंवाद ला शुभेच्छा देण्यासाठी
मा. रामकृष्ण बाविस्कर (केंद्रप्रमुख, पारोळा), मा. दत्तात्रय सोनवणे (मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक कन्या शाळा, मारवड), मा. मनोहर नेरकर (केंद्रप्रमुख, पष्टाणे, ता. धरणगाव), मा. शरद बी. पाटील (उपशिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यु. कॉलेज, अमळनेर) तसेच मा. डॉ. कुणाल पवार (मुख्याध्यापक, जि. प. प्राथ. शाळा ढेकू खुर्द व जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जळगाव) यांची उपस्थिती लाभली.
साहित्यिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘प्रखर जनसंवाद’ची वाटचाल अधिक सक्षम आणि व्यापक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

