रणाईचे माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीचा दिमाखदार उत्सव ‘रयतेचे राजे’ यांच्या विचारांनी विद्यार्थी प्रेरित; पुस्तक भेट देऊन अनोखी परंपरा
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीचा दिमाखदार उत्सव
‘रयतेचे राजे’ यांच्या विचारांनी विद्यार्थी प्रेरित; पुस्तक भेट देऊन अनोखी परंपरा
अमळनेर प्रतिनिधी
गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण विद्यालय परिसर भगव्या पताका, आकर्षक सजावट आणि शिवगर्जनेने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. इन्शुलकर, शिक्षकवृंद श्री. पी. डी. पाटील, श्री. बी. डी. ठाकरे, श्री. व्ही. एस. कापडणीस, श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती रीना पाटील, श्री. डी. व्ही. देसले, लिपिक श्री. एल. व्ही. पाटील, शिपाई श्री. जी. टी. पाटील तसेच विद्यार्थी-पालक प्रतिनिधी श्री. जयसिंग बंजारा व श्री. लक्ष्मण बंजारा उपस्थित होते. विद्यार्थी-विद्यार्थिनींचीही लक्षणीय उपस्थिती होती.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. राज्यकारभारातील दूरदृष्टी, गड-किल्ल्यांच्या मोहिमा, स्वराज्य स्थापनेतील संघर्ष आणि स्त्री-सन्मान व धर्मनिरपेक्षतेचा आदर्श यांसारख्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण माहिती मांडली. काही विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कविता सादर केल्या, तर काहींनी देशभक्तीपर नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमार्फत ‘रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज’ हे पुस्तक बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. ही उपक्रमशील परंपरा विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती आणि इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणारी ठरली.
मुख्याध्यापक श्री. डी. डी. इन्शुलकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिवाजी महाराजांच्या आदर्श नेतृत्वगुणांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना चांगले चरित्र, सुसंस्कारित आचार-विचार आणि देशप्रेम जोपासण्याचा संदेश दिला. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. आर. पाटील यांनीही शिवरायांच्या जीवनकार्याचे प्रेरणादायी उदाहरण देत विद्यार्थ्यांना स्वावलंबन व कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी प्रतिनिधींनी संयुक्तपणे केले. शेवटी सर्व उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करण्याचा आणि राष्ट्रसेवेचा संकल्प केला. उत्साह, अभिमान आणि प्रेरणेच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

