लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात रंगला ज्ञान-आनंदाचा मेळावा!
![]()
लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात रंगला ज्ञान-आनंदाचा मेळावा!
अमळनेर प्रतिनिधी
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला आनंदमेळावा उत्साह, आनंद आणि चैतन्याने ओथंबलेल्या वातावरणात अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिकच रंगतदार ठरला.
.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस आदरणीय विवेकानंदजी भांडारकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. दिपाली साळुंखे, नगरसेविका रूपाली शिवदे तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, लोकमान्य विद्यालयाचे शाळा समिती चेअरमन प्रा. डॉ. पी. जे. जोशी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. चौधरी, तसेच बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
आनंदमेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी उभारलेले विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि मनोरंजक स्टॉल्स. या स्टॉल्समधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, कौशल्याचे आणि सर्जनशीलतेचे प्रभावी प्रदर्शन घडविले. विविध प्रयोग, हस्तकला वस्तू, विज्ञान प्रात्यक्षिके, खेळ व माहितीपर उपक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. पालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट स्टॉलधारकांची निवड केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जितेंद्र बेडसे, राहुल सरदार व किशोर बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सुस्पष्ट व प्रभावी परिचय करून दिला. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भारावलेला जाणवत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाघ यांनी अत्यंत नेटक्या व प्रभावी शैलीत केले.
या आनंदमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षण, आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि सर्जनशील विचारांची संधी मिळाली. शिक्षणासोबत आनंदाचे नाते दृढ करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी नमुना ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

