ग्रामीण मातीतील नेतृत्वाचे यश बहादरपूरच्या महिलेच्या पुढाकारातून महिलांसाठी नवी संधी*
![]()
ग्रामीण मातीतील नेतृत्वाचे यश बहादरपूरच्या महिलेच्या पुढाकारातून महिलांसाठी नवी संधी*
अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथे दिनांक ११ जानेवारी २०२६, रविवार रोजी मंगळ ग्रह देवस्थान येथे Growing Up India Private Limited या कंपनीच्या वतीने उत्पादन लॉन्चिंगचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दर्शना पवार ( लेखिका), रिता भूपेंद्र बाविस्कर (महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य समिती सदस्य, मुंबई मंत्रालय) तसेच माधुरी दिनेश पवार (सहाय्यक कृषी अधिकारी, शिंदखेडा) या मान्यवरांच्या शुभहस्ते उत्पादनाचे विधिवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले. कंपनीच्या CMD सौ. हर्षदा गोपाल पाटील व MD श्री. प्रकाश यशवंतराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महिला केवळ स्वतःचे उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, तर समाजात सन्मानाने उभ्या राहून त्यांची सामाजिक उंचीही निश्चितच वाढेल.”
यानंतर कंपनीच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह हर्षाली पाटील, निशा पाटील व ममता पाटील यांनी उत्पादनाची गुणवत्ता, प्रशिक्षण व्यवस्था तसेच महिलांसाठी उपलब्ध रोजगार व व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.
माधुरी पवार, रिताताई बाविस्कर व दर्शना पवार यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून स्पष्ट केले की, “अशा उपक्रमांमुळे महिला आर्थिक स्वावलंबी होतील, निर्णयक्षम बनतील व आत्मविश्वासाने समाजात पुढे येतील. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे महिलांची कुटुंबात तसेच समाजात प्रतिष्ठा वाढून खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडेल.”
महिला सक्षमीकरण हे केवळ रोजगारापुरते मर्यादित नसून स्वाभिमान, आत्मविश्वास व नेतृत्व क्षमता घडवणारी चळवळ असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विजय पिंपळसे यांनी अत्यंत प्रभावी व संयत शब्दांत केले. कार्यक्रमास महिला उद्योजिका, प्रशिक्षणार्थी महिला, स्थानिक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंपनीच्या CMD सौ. हर्षदा गोपाल पाटील या बहादरपूर, तालुका पारोळा येथील रहिवासी असून त्या प्राथमिक शिक्षक गोपाल पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत त्यांनी महिलांच्या हातात उद्योग, आत्मविश्वास व स्वाभिमान देण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासोबतच सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासोबतच सामाजिक उन्नती घडवणारा ठरेल आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी नवे प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

