अमळनेरची राजकीय संस्कृती जपा; कुटुंबीयांवर टीका अस्वीकार्य पैशाच्या राजकारणात नैतिकतेचा बळी नको – संदीप घोरपडे
![]()
अमळनेरची राजकीय संस्कृती जपा; कुटुंबीयांवर टीका अस्वीकार्य
पैशाच्या राजकारणात नैतिकतेचा बळी नको – संदीप घोरपडे
अमळनेर | प्रतिनिधी :
अमळनेर शहराची ओळख शालिनता, नैतिकता व सांस्कृतिक जिव्हाळा अशी असून, ही परंपरा शहरातील राजकीय शहाणपणामुळे आजवर टिकून आहे. मात्र सध्याच्या पैशाच्या राजकारणात हे शहाणपण गहाण पडत असल्याचे चित्र दिसत असून, विरोधकांच्या कुटुंबीयांवर अश्लील व बेताल टीका होणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे स्पष्ट मत काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, “मी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून आमदारअनिल भाईदास पाटील यांचा शंभर टक्के राजकीय विरोधक आहे. मात्र राजकीय मतभेद कितीही तीव्र असले, व्यक्तिगत द्वेष कितीही असला तरी विरोधकांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणे अथवा त्यांना मानसिक त्रास देणारी वक्तव्ये करणे मी कधीही मान्य करणार नाही.”
अमळनेरची राजकीय परंपरा ही मुद्द्यांवर आधारित व सभ्य राजकारणाची राहिली आहे. पैशाच्या मग्रुरीपोटी नैतिकतेचा त्याग होऊ नये, तसेच राजकारणाची पातळी खालावू नये, यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आत्मसंयम पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“विरोधकांच्या धोरणांवर, कामकाजावर टीका करावी; मात्र त्यांच्या कुटुंबाला मानसिक वेदना होतील, समाजात बदनामी होईल अशा शब्दांचा वापर टाळावा,” असे आवाहन संदीप घोरपडे यांनी यावेळी केले.

