किसान सप्ताहात पळसखेडेत स्वच्छतेचा जागर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान व साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी
![]()
किसान सप्ताहात पळसखेडेत स्वच्छतेचा जागर
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान व साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी
पळसखेडे प्रतिनिधी :
किसान सप्ताहाच्या निमित्ताने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी पळसखेडे (मिराचे) येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांमार्फत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देणारी ही मोहीम गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी ठरली.
या कार्यक्रमाला माननीय सरपंच संजय पवार, उपसरपंच संदीप प्रल्हाद काळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यासह पळसखेडे (मिराचे), मोहाडी, देवपिंपरी व माळपिंपरी येथील कृषीदूतांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
गावचे सरपंच व शेतकरी बंधूंच्या हस्ते स्वच्छता मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. कृषीदूतांनी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गावातील इतर सार्वजनिक परिसराची स्वच्छता करत ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
या स्वच्छता मोहिमेनंतर पळसखेडे (मिराचे) येथील जि. प. प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारक, साहित्यिक, शिक्षक व देशभक्त साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सूत्रसंचालन रोशन नरोडे यांनी केले. कृषीदूतांच्या वतीने मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कृषीदूत सुशांत जाधव व किरण इंगळे यांनी साने गुरुजी यांच्या जीवनकार्यावर सविस्तर माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही आपले विचार मांडले. त्यानंतर अमन मोगल या कृषीदूताने विद्यार्थ्यांसाठी साने गुरुजींच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
स्वच्छता अभियानाचा समारोप कृषीदूत पार्थ बदाने यांनी आभारप्रदर्शन करून केला, तर जयंती कार्यक्रमाचा समारोप महेश पाटील यांनी आभार मानून केला.
या उपक्रमामुळे स्वच्छता, सामाजिक जाणीव व मूल्यशिक्षणाचा प्रभावी संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

