१२ ऑगस्टला श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी : श्रावणातील पावसात निसर्ग-सान्निध्यातील भक्तिमय प्रवास
![]()
१२ ऑगस्टला श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी : श्रावणातील पावसात निसर्ग-सान्निध्यातील भक्तिमय प्रवास
अमळनेर प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ९ वाजता विजय मारुती मंदिरातून रथात विराजमान श्री मारुतीरायांच्या मूर्तीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान होईल. सवाद्य बँड पथक, भजनी मंडळांचे गजर, भक्तिगीतांचा निनाद आणि “जय हनुमान”च्या घोषात ही दिंडी भक्तीरसात तल्लीन होत पहिलाड, साईबाबा मंदिर, पारोळा मार्गे पुढे सरकेल.
पहिला मुक्काम आडगाव येथील हनुमान मंदिरात मंगळवार रात्री ठरणार असून, बुधवार पहाटे कजगाव मार्गे दिंडी पातोंडा (ता. चाळीसगाव) येथे पोहोचेल. गुरुवारी सकाळी चाळीसगाव मार्गे कन्नड येथे मोठा हनुमान, माळीवाडा मंदिरात मुक्काम होईल. शुक्रवारी पहाटे घृष्णेश्वर आणि वेरूळ लेणी मार्गे श्रीक्षेत्र भद्रा मारुती मंदिरात आगमन होऊन संध्याकाळी भजन-कीर्तनांचा कार्यक्रम होईल. शनिवारी पहाटे सामूहिक दर्शन घेऊन दिंडीचा समारोप होईल.
या दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे पवित्र श्रावण महिन्यातील रिमझिम पाऊस, हिरव्या वनराईतून होणारा प्रवास आणि पर्यावरणाच्या सान्निध्यातील भक्तिमय अनुभव. पावसाच्या सरींमध्ये आणि निसर्गाच्या हिरवाईत नाहून, श्रद्धाळूंचे मन प्रसन्न होते व मनोकामना पूर्णत्वास जातात.
दिंडीत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सर्वांसाठी मोफत निवास व भोजनाची सोय आयोजक प्रताप साळी, दीपक आबा, श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह अमळनेर यांच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व भाविकांनी या पायी दिंडीत सहभागी होऊन हनुमानजींच्या कृपाशिर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—

