मांडळ फड बंधारा वितरिका क्र. १ बंदिस्त पाईपलाईनने जोडण्याची मागणी , डॉ. दिपक पाटील यांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे; शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसह ८ ते १० गावांच्या पाणीप्रश्नाला मिळणार दिलासा
![]()
मांडळ फड बंधारा वितरिका क्र. १ बंदिस्त पाईपलाईनने जोडण्याची मागणी
डॉ. दिपक पाटील यांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे; शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसह ८ ते १० गावांच्या पाणीप्रश्नाला मिळणार दिलासा
अमळनेर प्रतिनिधी
मांडळ ता. अमळनेर येथील मांडळ फड बंधारा कालव्याच्या वितरिका क्र. १ च्या शेवटच्या टोकावरील धोकादायक परिस्थिती दूर करण्यासाठी सदर भागात बंदिस्त पाईपलाईन करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांनी कॅबिनेट मंत्री तथा जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मांडळ बंधारा कालवा दुरुस्तीचे विशेष दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, वितरिका क्र. १ च्या शेवटच्या टोकाचा भाग भाला नाल्यात येत असून, या ठिकाणी कालवा तब्बल ३ ते ४ मीटर खोलीमध्ये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या खोल भागावर अद्याप कोणतेही पुरेसे सुरक्षा बांधकाम नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांसाठी हा भाग धोकादायक ठरत आहे.
रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी अनेकदा रात्री, पहाटे किंवा अंधाराच्या वेळेत या मार्गावरून जावे लागते. कालवा खोल असल्याने आणि त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, यापूर्वी अपघातही घडत असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे.
या समस्येवर केवळ रस्ता व पूल बांधल्याने कायमस्वरूपी तोडगा निघणार नसून, वितरिका क्र. १ च्या आवश्यक लांबीमध्ये बंदिस्त पाईपलाईन करणे हाच सुरक्षित व प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाईपलाईन झाल्यास सिंचनासोबत पाणीप्रश्नही सुटणार
मांडळ फड बंधारा वितरिका क्र. १ बंदिस्त पाईपलाईनद्वारे करण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर मार्गी लागेलच; शिवाय संबंधित सिंचन क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे, भाला नाल्यावरील बंधारे भरल्यास परिसरातील सुमारे ८ ते १० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे हे काम केवळ सिंचनाच्या दृष्टीने नव्हे, तर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.
सत्वर प्रस्ताव मागवून मंजुरी देण्याची मागणी
जलसंपदा विभागाने सदर बाबीची गांभीर्याने दखल घेऊन वितरिका क्र. १ च्या बंदिस्त पाईपलाईनचा आवश्यक प्रस्ताव मागवावा, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून त्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांनी केली आहे.
या मागणीमुळे मांडळसह परिसरातील शेतकऱ्यांना सुरक्षित मार्ग, सिंचनासाठी अधिक सक्षम व्यवस्था आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग व शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कामाला गती देतील, अशी आशा परिसरातील शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.
निवेदनाची प्रत मुख्य अभियंता, तापी विकास महामंडळ, जळगाव यांनाही माहितीस्तव व सत्वर कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली



