हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे
1 min read

हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे

Loading

हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे
________
महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ‘आधार’ गावातील समाधान रावसाहेब हिरे यांचा प्रवास. १९९८ मध्ये एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘मोरगन ऍग्रोटेक’ आणि ‘साई गिरणा’ या नावांनी एका मोठ्या वलयाच्या रूपात पोहोचला आहे. अडीच एकर शेतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज २५० एकरवर पसरलेल्या विविध ६ ते ७ कंपन्यांच्या औद्योगिक साम्राज्यापर्यंत पोहोचला असून, तो थक्क करणारा आहे.

समाधान हिरे यांचे शिक्षण गावात आणि नंतर मालेगाव येथे झाले. इलेक्ट्रिक विषयाचे तांत्रिक शिक्षण घेऊन त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःची वेगळी वाट निवडली. ‘साई गिरणा मल्टीस्टेट दूध प्रक्रिया दूध संघ’ स्थापन करून त्यांनी खऱ्या अर्थाने उद्योजकतेचा श्रीगणेशा केला. मात्र, हे यश केवळ एका व्यक्तीचे नव्हते, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या योगदानाचे होते. त्यांच्या पत्नी रेखा हिरे यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे मोठे जाळे विणले. महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी महिलांना कर्जपुरवठा करून त्यांना पशुपालनासाठी प्रवृत्त केले. या एका निर्णयामुळे प्रत्येक घराघरात दुधाचा व्यवसाय सुरू झाला आणि एका मोठ्या आर्थिक क्रांतीचा पाया रचला गेला.

या कार्यात समाधान यांना त्यांचे बंधू संजय हिरे आणि महेंद्र हिरे यांची भक्कम साथ मिळाली. या भावंडांनी मिळून व्यवस्थापनाची धुरा सांभाळली, ज्यामुळे आज हा व्यवसाय केवळ उत्तर महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात विस्तारला आहे. मोरजन ऍग्रो टेकने केवळ दूध व्यवसायातच नव्हे, तर पशुखाद्य निर्मिती, इथेनॉल प्रकल्प आणि मिल्क पावडर निर्मिती अशा विविध क्षेत्रांत आपले मोठे ब्रँड्स निर्माण केले आहेत. आज या कंपन्या किती कोटींची उलाढाल करतात, यापेक्षा त्यांनी किती हजार हातांना रोजगार दिला आणि किती शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीची चूल पेटवली, हे अधिक महत्त्वाचे आहे.

समाधान हिरे यांची पुढची पिढीदेखील आता या कार्याला शास्त्रीय आणि आधुनिक ज्ञानाची जोड देत आहे. कन्या हर्षली वैद्यकीय शिक्षण घेत असून, पुत्र प्रितेश हा या सर्व प्रकल्पांना जागतिक दर्जाचे शास्त्रीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ‘सीए’चे उच्च शिक्षण घेत आहे. या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले त्यांचे वडील साहेबराव हिरे आजही तितक्याच निष्ठेने शेती करतात. “माझ्या मुलाने हजारो कुटुंबं मोठी केली याचा सार्थ अभिमान आहेच, पण त्याहून मोठे समाधान हे आहे की, त्याने कधीही निसर्गाशी प्रतारणा केली नाही किंवा लोकांच्या आरोग्याशी खेळ केला नाही,” असे ते अभिमानाने सांगतात.

“नोकरीच्या मागे धावू नका, तर शेतीला उद्योगाची जोड द्या,” हा समाधान हिरे यांचा मंत्र आज हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी उभे राहिलेले हे साम्राज्य महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक इतिहासातील एक सुवर्णपान ठरले आहे.

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *