बदलत्या काळात नाती संवेदनशील : साहित्यिक श्रीकांत मोरे साहित्य, उद्योगी सेवाकर्मींचा प्रेरणादायी सन्मान मोरे, काकडे दाम्पत्याचा अनोखा ‘सहजीवन सोहळा’ गोव्यात रंगला
![]()
बदलत्या काळात नाती संवेदनशील : साहित्यिक श्रीकांत मोरे
साहित्य, उद्योगी सेवाकर्मींचा प्रेरणादायी सन्मान
मोरे, काकडे दाम्पत्याचा अनोखा ‘सहजीवन सोहळा’ गोव्यात रंगला
पणजी (गोवा) : बदलत्या काळात नाती अधिक संवेदनशील झाली असून त्यांना जपण्यासाठी संवाद आणि संयम या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, सहकार महर्षी श्रीकांत मोरे यांनी केले.
मनोरमा साहित्य मंडळ, सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकांत मोरे – सौ. शोभा मोरे तसेच वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी संभाजीराव काकडे – संजीवनी काकडे यांच्या सहजीवनाच्या ४० वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित ‘सहजीवन सोहळा’ गोव्यातील मेरियॉट रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा अनोखा ठसा उमटवला.
कार्यक्रमात साहित्य, कला आणि समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दाम्पत्यांचा गौरव करण्यात आला. गोव्यातील पाच कलाप्रेमी व सेवाभावी दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सन्मानित दाम्पत्यांमध्ये राजेंद्र केरकर – पौर्णिमा केरकर, डॉ. दत्ताराम देसाई – ऊर्मिला देसाई, राजेंद्र देसाई – आरती देसाई, जयंत मिरिंगकर – दीपा मिरिंगकर, प्रकाश क्षीरसागर – चित्रा क्षीरसागर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणातून सध्याच्या सामाजिक बदलांचा वेध घेतला. प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत मोरे, सौ. शोभा मोरे, संभाजीराव काकडे, संजीवनी काकडे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच लेखिका डॉ. अनुजा जोशी उपस्थित होत्या.
याच निमित्ताने आयोजित ‘रंग सहजीवनाचे’ या विशेष कवीसंमेलनाने कार्यक्रमाला वेगळेच भावविश्व दिले. दया मित्रगोत्री, कविता बोरकर, अंजली चितळे, चंद्रशेखर गावस, डॉ. विनय बापट, मेघना कुरूंदवाडकर, डॉ. नीता तोरणे, लक्ष्मण पित्रे, सोनाली धीरज परब, पूर्णिमा देसाई, सचिन मणेरीकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, कालिका बापट, प्रमोद कारापूरकर, विश्वनाथ जोशी, गौरी कुलकर्णी, नितीन कोरगावकर, मंजिरी वाटवे आणि यतीन फाटक या कवी-कवयित्रींनी सहजीवनाच्या विविध छटा आपल्या कवितांमधून उलगडल्या. कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान श्रीकांत मोरे व सौ. शोभा मोरे यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन सौ. श्रुती हजारे यांनी प्रभावीपणे केले.
बदलत्या काळात नाती अधिक संवेदनशील : श्रीकांत मोरे
‘सहजीवन’ ही केवळ दोन व्यक्तींच्या एकत्र राहण्याची संकल्पना नसून दोन मनांची, विचारांची आणि प्रवासांची सुसंवादी सांगड आहे, असे मत श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केले.
४० वर्षांच्या सहजीवनाकडे मागे वळून पाहताना त्यांनी हा प्रवास संघर्ष, समजूतदारपणा आणि विश्वास यांचा असल्याचे सांगितले. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देणे, चुका समजून घेणे आणि वेळोवेळी बदल स्वीकारणे हीच सहजीवनाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
“नातं टिकवायचं असेल, तर ‘मी’पेक्षा ‘आपण’ हा विचार महत्त्वाचा असतो,” असे ते भावनिक शब्दांत म्हणाले. सौ. शोभा मोरे यांच्या सहकार्याशिवाय स्वतःची वाटचाल इतकी समृद्ध झाली नसती, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आजच्या बदलत्या काळात नाती अधिक संवेदनशील झाली असून त्यांना जपण्यासाठी संवाद आणि संयम अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगत, तरुण पिढीला सहजीवनाकडे जबाबदारी आणि जिवंत प्रवास म्हणून पाहण्याचा संदेश दिला.
फोटो ओळ
मनोरमा साहित्य मंडळ, सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहजीवन सोहळ्या’चे दीपप्रज्वलन करताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे, सौ. शोभा मोरे, संभाजीराव काकडे, संजीवनी काकडे व उपस्थित मान्यवर.

