कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्ञानसेवेचा सुवर्णप्रवास; मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन यांची ३७ वर्षे ५४ दिवसांच्या निष्कलंक सेवेनंतर सन्माननीय सेवापूर्ती
![]()
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्ञानसेवेचा सुवर्णप्रवास; मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन यांची ३७ वर्षे ५४ दिवसांच्या निष्कलंक सेवेनंतर सन्माननीय सेवापूर्ती
विद्यार्थीहित, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आदर्श प्रशासन आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाची अविस्मरणीय कारकीर्द; शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी अध्यायाचा गौरवपूर्ण समारोप
अमळनेर प्रतिनिधी
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्ञानसेवेचा सुवर्णप्रवास; मुख्याध्यापक रवींद्र विश्वनाथ महाजन यांची ३७ वर्षे ५४ दिवसांच्या निष्कलंक सेवेनंतर सन्माननीय सेवापूर्ती
शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. आपल्या ज्ञानाने, संस्कारांनी आणि कर्तव्यनिष्ठेने अनेक पिढ्या घडविण्याचे भाग्य ज्यांच्या वाट्याला येते, अशा शिक्षकांचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी ठरते. अशाच आदर्श, संयमी आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनवर्दे-बुधगावचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. रवींद्र विश्वनाथ महाजन (रा. दहिवद, ता. अमळनेर) यांनी ८ जून १९८९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत तब्बल ३७ वर्षे ५४ दिवस ज्ञानदानाची अखंड सेवा बजावत नियत वयोमानानुसार सन्मानाने सेवापूर्ती केली.
त्यांचा सेवाप्रवास म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटी आणि विद्यार्थीहिताची अखंड साधना होय. सेवाकाळात कोणताही डाग न लागता त्यांनी शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य केले. धरणगाव, अमळनेर आणि चोपडा या तीन तालुक्यांमध्ये विविध पदांवर कार्य करत त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला.
उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि ग्रेडेड मुख्याध्यापक अशा प्रत्येक जबाबदारीत त्यांनी विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च मानले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी प्रशासन, शिक्षकांमधील समन्वय, पालकांशी सुसंवाद आणि गावाशी जिव्हाळ्याचे नाते जपत त्यांनी शाळेला प्रगतीच्या दिशेने नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी घडले, शिक्षकांना प्रेरणा मिळाली आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली.
रवींद्र महाजन यांचा स्वभाव हा त्यांचा सर्वात मोठा गुण ठरला. शांत, संयमी, प्रेमळ, सुसंस्कृत, सेवाभावी, समंजस, समाजप्रिय, सदाचारी आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याचे धैर्य, निर्णयक्षम नेतृत्व आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देण्याची त्यांची भूमिका सर्वांसाठी आदर्श ठरली.
त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता – “कर्म हाच वशीला, कर्म हीच पूजा आणि कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र.” त्यामुळे सेवेच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी तितक्याच उत्साहाने आणि समर्पणाने कार्य केले. वय, थकवा किंवा परिस्थिती यांना कधीही कारण न बनवता शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी आनंदाने जबाबदाऱ्या पार पाडल्या.
त्यांच्या यशस्वी प्रवासामागे त्यांच्या सहचारिणी सौ. सुनिता रवींद्र महाजन यांचेही मोलाचे योगदान आहे. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी कायम खंबीर साथ दिली. संस्कार, प्रेम, जिव्हाळा आणि सात्त्विक जीवनशैली यांमुळेच रवींद्र महाजन यांना समाजासाठी इतक्या निष्ठेने कार्य करता आले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.


आज सेवापूर्तीच्या या मंगलक्षणी त्यांच्या कार्याचा गौरव करताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि कृतज्ञतेची भावना आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वासाठी निरोगी, आनंदी, समृद्ध आणि यशस्वी आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील काळातही त्यांच्या हातून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात असेच समाजोपयोगी कार्य घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ज्ञानदीप तेवत ठेवला, संस्कारांची केली शिदोरी,
कर्तव्यनिष्ठ सेवेला आज लाभली सन्मानाची दोरी.
दुसरी इनिंगही अशीच यशस्वी, आनंदी आणि मंगल होवो,
निरोगी, दीर्घायुषी जीवन लाभो, हीच शुभेच्छांची फुलांची ओंजळ ठरो!
शुभेच्छुक :
आबासाहेब श्री. गोकुळ पाटील (माजी केंद्रप्रमुख)
ताईसौ. प्रमिला पाटील (आदर्श अंगणवाडी सेविका)
रामेश्वरकर, ता. अमळनेर, जि. जळगाव.ही

