गुढी पाडव्याच्या सुरेल साजात ‘भावसरगम’ची अविस्मरणीय मैफल; अमळनेरकर तृप्त! , ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली ग्रुपचा संयुक्त उपक्रम; जुन्या टाऊन हॉलमध्ये भावगीतांची अविस्मरणीय मेजवानी
![]()
गुढी पाडव्याच्या सुरेल साजात ‘भावसरगम’ची अविस्मरणीय मैफल; अमळनेरकर तृप्त!
ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली ग्रुपचा संयुक्त उपक्रम; जुन्या टाऊन हॉलमध्ये भावगीतांची अविस्मरणीय मेजवानी
अमळनेर प्रतिनिधी :
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमळनेर येथे संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरलेला ‘भावसरगम’ हा सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली ग्रुप, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ मार्च २०२६ रोजी गुरुवारी सायंकाळी जुना टाऊन हॉल, टिळक मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वाद्यवृंदाच्या सुरेल साथीने सादर झालेल्या या कार्यक्रमात स्वरांजली ग्रुपच्या स्थानिक कलाकारांनी भावगीतांची अप्रतिम मैफल रंगवली. प्रत्येक सादरीकरणाला अमळनेरकर रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद देत सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मराठी भावगीतांच्या सुरांनी कार्यक्रमाने रसिकांच्या अंतर्मनाला स्पर्श केला आणि एक वेगळीच आनंदमयी अनुभूती दिली.
कार्यक्रमात ‘अविरत ओठी व्हावे नाम’ हे गीत डॉ. गौरव मुठे यांनी सादर केले, तर ‘विकत घेतला शाम’ हे गीत सौ. युगछाया शिंगाणे यांनी सुरेलपणे सादर केले. ‘सख्यारे घायाळ मी हरिणी’ हे गीत सौ. विद्या पाटील यांनी भावपूर्ण गायले. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी’ हे गीत श्री. प्रदीप शिंगाणे यांनी रंगतदार पद्धतीने सादर केले. तसेच ‘साधी भोळी मीरा तुला’ हे गीत सौ. नेहा देशपांडे यांनी आणि ‘अखेरचा हा तुला दंडवत’ हे गीत सौ. पुनम अग्रवाल यांनी अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ प्रभाकर जोशी होते.श्री किशोर देशपांडे सर .
प्रमुख –स्वरांजली गृप , अमळनेर
अध्यक्ष , ज्ञानराज प्रतिष्ठान अमळनेर यांनी मान्यवरांचा स्वागत केले.
याशिवाय अनेक सुमधुर भावगीतांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. हार्मोनियमवर श्री. किशोर देशपांडे यांनी सुरेल साथ दिली, तर तबला-ढोलकीवर देवांश गुरव यांनी उत्कृष्ट ताल साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा शहा यांनी प्रभावीपणे केले. ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी श्री. धनराज पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
स्वरांजली ग्रुपचे सर्व कलाकार हे स्थानिक अमळनेर येथील असून त्यांनी आपल्या कलागुणांनी कार्यक्रमाला चार चांद लावले. हा ‘भावसरगम’ कार्यक्रम अमळनेरच्या सांस्कृतिक जीवनात एक अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.

