रणाईचे शिवारात एमएसईबीच्या तारांची चोरीचा प्रयत्न; पिकांना पाणी अडकल्याने शेतकरी दुहेरी संकटात
![]()
रणाईचे शिवारात एमएसईबीच्या तारांची चोरीचा प्रयत्न; पिकांना पाणी अडकल्याने शेतकरी दुहेरी संकटात
अमळनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील रणाईचे येथील शिवारात डी. एम. पाटील यांच्या शेताजवळ एमएसईबीच्या वीजवाहिन्यांच्या तारांची चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २४ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी वीजपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सात ते आठ गाळे (तारांच्या गुंडाळ्या) चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिकांना संशय आल्याने तात्काळ हालचाल सुरू झाली. माहिती पसरताच त्या भागातील सरपंच ,वकील बाबा, एमएसईबीचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी घटनास्थळी दाखल झाले.
लोकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी काही तार तिथेच टाकून घाईघाईने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तारा चोरीला गेल्यामुळे पंप सुरू होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यंदा आधीच शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत वीज साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
दरम्यान, “पोलीस प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामीण भागात वाढत्या वीजसाहित्य चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

