विज्ञानवादी दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी प्रबोधन उमाळे येथे एनएसएस कॅम्पअंतर्गत अंनिसतर्फे मार्गदर्शन; विद्यार्थी-ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
![]()
विज्ञानवादी दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी प्रबोधन
उमाळे येथे एनएसएस कॅम्पअंतर्गत अंनिसतर्फे मार्गदर्शन; विद्यार्थी-ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
जळगांव प्रतिनिधी :
समाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि वैज्ञानिक विचारांची गरज या विषयावर विज्ञानवादी दृष्टिकोनातून समाज प्रबोधन हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 09 जानेवारी 2026 रोजी उमाळे येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उत्साहात पार पडला. हा उपक्रम श्री. चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या एनएसएस कॅम्पच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास श्री. चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. जयेश वाल्हे, डॉ. आशा शंकरवार, उमाळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रघुनाथभाऊ चव्हाण, पी.आर.ओ. नवल परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी **अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)**तर्फे प्रबोधन सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे जळगाव जिल्हा संघटक मा. विनोदजी सपकाळे होते. यावेळी समितीचे पदाधिकारी डॉ. जयेश वाल्हे व प्रसिद्धी प्रमुख श्री. महेश शिंपी उपस्थित होते.
प्रसिद्धी प्रमुख महेश शिंपी यांनी अंनिसच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, सन 1982 पासून अंनिस संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थान या राज्यांमध्ये सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत आहे. समितीचा देव-धर्माला विरोध नसून, देव-धर्माच्या नावाखाली जनतेची लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध वैज्ञानिक प्रबोधन करणे हाच आमचा उद्देश आहे, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
यानंतर जळगाव जिल्हा संघटक विनोद सपकाळे यांनी विज्ञानवादी दृष्टिकोनातून आजवर उघडकीस आलेल्या विविध बनावट चमत्कारांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. शकुंतलादेवी, पायलट बाबा, कृपाळू महाराज, बोलका पत्थर, मोरेसो रेसल्लो, बेबी राठोड, गुलाब बाबा, शेळके बाबा, रजाक बाबा, मोहिनुद्दीन शमशुद्दीन कादरी, रोफ बाबा, विदेशी पादरी, शुकदास महाराज, सुंदरदास महाराज, नैनोदचा बाबा, आनंदी माता अशा असंख्य तथाकथित बाबांच्या चमत्कारांचे प्रात्यक्षिकांसह भांडाफोड करत त्यांनी उपस्थितांची डोळे उघडले.
त्यानंतर डॉ. जयेश वाल्हे यांनी समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन का आवश्यक आहे, तसेच अंधश्रद्धांच्या माध्यमातून सामान्य नागरिक कशा प्रकारे फसवले जातात याचे सखोल आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण विद्यार्थ्यां व ग्रामस्थांसमोर मांडले.
या कार्यक्रमास उमाळे गावातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. जयेश वाल्हे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आशा शंकरवार, श्री. नवल परदेशी, सरपंच श्री. रघुनाथभाऊ चव्हाण तसेच श्री. चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



