ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला
1 min read

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला

Loading

​ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला

​जळगाव: दि.८/०१/२०२६ येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या शैक्षणिक व नैतिक प्रगतीचा गौरव करणारा हा सोहळा विद्यालयाच्या गुणवत्तेची साक्ष देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव चे प्रशासकीय अधिकारी श्री. शशिकांत वडोदकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सोसायटीचे सचिव मा. ॲड. प्रमोद पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता फालक, किलबिल बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना नेमाडे आणि शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. निर्मल चतुर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे यांनी शाळेच्या उत्तुंग वाटचालीचे सूत्र मांडले. त्या म्हणाल्या की, “ए. टी. झांबरे विद्यालय हे केवळ ज्ञानाचे मंदिर नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे संस्कार केंद्र आहे. आजचा हा सोहळा म्हणजे वर्षभर विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यांचा गौरव आहे. शाळेचे प्रत्येक यश हे सामूहिक मेहनत आणि अभ्यासू वृत्तीचे फळ आहे. आमचे ध्येय केवळ परीक्षार्थी घडवणे नसून समाजाला सुजाण नागरिक देणे हे आहे.” यावेळी त्यांनी शिक्षकांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले की, जेव्हा शिक्षक स्वतः प्रगत होतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते.
​या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री. दिगंबर पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल, तर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल श्री. महेंद्र नेमाडे व सौ. रत्नमाला शिंदे यांचा गौरव करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या श्री. निर्मल चतुर यांचाही विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
​विद्यार्थी पुरस्कारांमध्ये शाळेतील ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ म्हणून करण भूषण पाटील आणि ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी’ म्हणून कुमारी भूमिका गोपाळ चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या कुमारी सृष्टी विशाल कुलकर्णी आणि दामोदर धनंजय चौधरी यांनाही गौरवण्यात आले. इयत्तानिहाय प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी नूतन महेंद्र बारी (५ वी), शाश्वत विशाल कुलकर्णी (६ वी), कुमारी गुंजन दिगंबर ढाके व हेमांगी निलेश सावळे (७ वी), कुमारी संस्कृती जयवंत खैरनार व कृष्णा अजय बडगुजर (८ वी), आणि करणभूषण पाटील व कुमारी भूमिका गोपाळ चौधरी (९ वी) या गुणवंतांचा समावेश होता.
​कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांच्या नियोजनाखाली पार पडले. कार्यक्रमाची शब्दरूपी गुंफण आणि बहारदार सूत्रसंचालन सौ. मनीषा जयकर व सौ. रत्नमाला शिंदे यांनी आपल्या प्रभावी वाणीने श्रोत्यांची मने जिंकून घेतले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *