राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आक्रमक; मोदींच्या पुतळ्याचे दहन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी , विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई, राहुल गांधी यांची अटक आणि वाढत्या लोकशाही प्रश्नांवर काँग्रेसचा संताप
![]()
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आक्रमक; मोदींच्या पुतळ्याचे दहन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई, राहुल गांधी यांची अटक आणि वाढत्या लोकशाही प्रश्नांवर काँग्रेसचा संताप
जळगाव प्रतिनिधी
दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जळगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दडपण्याचा प्रयत्न होत असून, विरोधी मतांना पोलिसांच्या माध्यमातून रोखले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आंदोलनादरम्यान “लोकशाही वाचवा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “हुकूमशाहीचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
सध्याच्या परिस्थितीवर काँग्रेसची टीका
यावेळी बोलताना काँग्रेसच्या नेत्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण क्षेत्रातील वाढते प्रश्न, लोकशाही संस्थांवरील विश्वास आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनांवर होणारी कारवाई यामुळे देशात असंतोष वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असून, आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी, ज्येष्ठ पदाधिकारी विजय वाणी, युवक अध्यक्ष मुजीब पटेल, जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख, सचिव दीपक सोनवणे, सचिव जाकिर बागवान, जळगाव तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, रफिक शेख, दिनेश पाटील, दीपक पाटील, प्रवीण पाटील, भुवन्यू सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

