निसर्डी धरण दुरवस्थेवर ग्रामस्थांची नाराजी! गटातील विकासाअभावी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांच्याशी थेट चर्चा
![]()
निसर्डी धरण दुरवस्थेवर ग्रामस्थांची नाराजी!
गटातील विकासाअभावी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांच्याशी थेट चर्चा
अमळनेर प्रतिनिधी –
जानवे–मंगरूळ जिल्हा परिषद गटात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आजही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खास करून निसर्डी धरणाची दुरवस्था, धरणाची देखभाल न होणे आणि पांझरा नदीचे पाणी धरणात वळविण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आज उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर (कै. धनगर अर्जून पाटील यांचे परीश्रमक) यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “दर निवडणुकीत धरणात पाणी टाकण्याचे आश्वासन देऊन मते घेतली जातात. आजही पांझऱ्याचे पाणी धरणात सोडल्यास ५० पेक्षा अधिक खेड्यांतील शेतकरी उज्वल होणार आहेत, परंतु प्रत्यक्षात कोणतीही हालचाल होत नाही.”
गटातील विविध विकासकामांचा अभाव, अतिवृष्टीचा लाभ न मिळणे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न होणे, आणि सर्वसामान्यांसाठी आमसभादेखील न घेणे—या सर्व कारणांमुळे जनतेत नाराजी वाढली आहे. ग्रामस्थांनी सवाल केला की, “नेते राजकारणाचा आधार स्वतःचे अस्तित्व वाढविण्यासाठी घेत आहेत की जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी? आम्ही त्यांना प्रतिनिधित्व दिले, ते आर्थिक फायद्यासाठी नाही.”
या वेळी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांनी ठाम भूमिका मांडत स्पष्ट केले—
“जर विद्यमान आमदार व खासदार यांनी निसर्डी धरणाला नवसंजीवनी दिली, तर मी माझी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे. मी सत्तेसाठी नाही, तर शेतकरी वर्गासाठी लढतो आहे.”
या चर्चेत उपस्थित ग्रामस्थ मंडळाने आपल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचा आग्रह धरला.
उपस्थित ग्रामस्थ मंडळ:
मार्गदर्शक बापू साहेब जगन्नाथ राजमल पाटील,श्री. संदीप पंढरीनाथ पाटील,श्री. मोतीलाल पोपट पाटील,श्री. दिपक भिमराव पाटील,श्री. रविंद्र चुनिलाल पाटील,
श्री. ज्ञानेश्वर दसरथ पाटील,श्री. ज्ञानेश्वर आसाराम पाटील,श्री. सौरभ गुलाब पाटील,श्री. राकेश भिमराव पाटील,श्री. सचिन महादू पाटील
ग्रामस्थांनी या भेटीनंतर पुढील भूमिकेकडे लक्ष ठेवण्याचे ठाम निश्चय केला असून, स्थानिक नेतृत्व आणि उमेदवारांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

