प्रभाग क्र. १५ मध्ये तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात, सौ. भाग्यश्री जैन (पाटील) यांच्या उपक्रमांतून विकास, संस्कार आणि सेवेची एकजूट
![]()
प्रभाग क्र. १५ मध्ये तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात
सौ. भाग्यश्री जैन (पाटील) यांच्या उपक्रमांतून विकास, संस्कार आणि सेवेची एकजूट
अमळनेर, प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रभाग क्रमांक १५ मध्ये सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा आणि विकासाची भावना एकत्र आणणारा तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा सौ. भाग्यश्री भावेश जैन (पाटील) यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला. महिलांपासून युवकांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिलांसाठी भेटवस्तू वितरण हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा भाग होता. सौ. भाग्यश्री यांनी प्रत्येक महिलेला शुभेच्छासह उपयोगी भेटवस्तू देऊन उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी निर्माण केली. या कार्यक्रमास नगराध्यक्षा ताईसो. जयश्री अनिल पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, शिक्षित आणि संवेदनशील नेतृत्व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवते आणि सौ. भाग्यश्री जैन यांच्या नेतृत्वातून प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
सौ. भाग्यश्री जैन (पाटील) या Electronics & Telecommunication या शाखेच्या अभियंता असून आधुनिक विचार आणि पारंपरिक मूल्यांचा सुंदर समतोल त्यांच्या कार्यातून दिसून येतो. त्या म्हणतात, “माझं ध्येय सत्तेचं नाही, सेवेचं आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित, समाधानी आणि विकसित व्हावं हा माझा प्रयत्न असेल.” त्या प्रभागातील युवकांना रोजगार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचत गट आणि लघुउद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठीही प्रयत्नशील राहतील असे त्यांनी सांगितले.
सौ. भाग्यश्री यांचे पती भावेशभाऊ गुलाबचंद जैन हे अन्नदान, कोविड काळातील मदतकार्य, धार्मिक सामाजिक उपक्रम अशा विविध माध्यमातून समाजकार्यात सक्रिय आहेत. कोणतेही दुःख असो, आजारपण असो किंवा मदतीची वेळ—ते श्रेय न घेता मदतीला धाव घेतात. त्यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेनेच सौ. भाग्यश्री जैन समाजकारणात सक्रियपणे पुढे येत आहेत. या उपक्रमाच्या यशामागे सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार, भावेशभाऊ जैन मित्र परिवार, गजसुदर्शन मित्र मंडळ, नागेश्वर मंदिर मित्र मंडळ, जय अंबे मित्र मंडळ, तरूण कुढापा मित्र मंडळ, भगवा चौक मित्र मंडळ, हुतात्मा रमेश बोरसे चौक मंडळ तसेच विविध कॉलनी व सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात नगराध्यक्षा ताईसो. जयश्री अनिल पाटील, साई गजानन मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब एस. एम. पाटील, मराठी वाड्मय मंडळ व अर्बन बँक संचालिका ताईसो. वसुंधरा लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण-तरुणी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम शोभिवंत केला. “साथ हवी लढायला, आशीर्वाद हवेत जिंकायला…” अशा शब्दांत सौ. भाग्यश्री जैन यांनी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक एकता, संस्कृती आणि सेवाभावी नेतृत्वाचा संदेश देणारा हा उपक्रम प्रभागातील नागरिकांच्या मनात विश्वासाचा प्रकाश पेरणारा ठरला.


