स्पर्धा म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे” — विजयसिंह पवार सर मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा
![]()
“स्पर्धा म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे” — विजयसिंह पवार सर
मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा
अमळनेर प्रतिनिधी :
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” या प्रेरणादायी कार्यक्रमात सानेगुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार सर यांनी आपल्या प्रभावी व विचारप्रवर्तक शब्दांत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आजच्या युगात स्पर्धा म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन राहिलेले नाही, तर ती स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःमध्ये असलेली क्षमता ओळखण्याची प्रक्रिया आहे.” विद्यार्थ्यांनी अपयशाला भीक न घालता, त्यातून शिकण्याची आणि नव्याने उभे राहण्याची वृत्ती ठेवावी, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
पुढे ते म्हणाले, “समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांचा त्रिसूत्री बंध एकत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक अदृश्य ज्योत असते, ती फक्त योग्य मार्गदर्शनाने प्रज्वलित करता येते.”
त्यांनी मराठी लाईव्ह न्युजच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की, “पत्रकारिता ही केवळ बातम्यांची गोष्ट नाही, तर ती समाजात विचारांची मशाल पेटवणारी साधना आहे. अशा माध्यमांनी समाजातील संवेदनशीलता जपली पाहिजे.”
विजयसिंह पवार सर यांच्या या प्रेरणादायी मनोगतातून विद्यार्थ्यांसह उपस्थित श्रोत्यांना विचार करायला लावणारा नवा दृष्टिकोन मिळाला. त्यांच्या शब्दांतून शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” या भव्य कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक शब्दांत मार्गदर्शन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि विशेष आमंत्रित मान्यवर यांच्या मनोगतांनी सभागृहात प्रेरणा, ऊर्जावानता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.यावेळी११ वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार बंधू भगिनींना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल,बुक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रेरणादायी मनोगत..
कपिल पवार (उपयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक)
कपिल पवार यांनी म्हटले की, “यशस्वी व्यक्तिमत्व घडविण्याची गुरुकिल्ली म्हणजे प्रामाणिकपणा आणि चिकाटी. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी आपल्या कामात जबाबदारीची भावना आणि आत्मनिष्ठा असली पाहिजे.” त्यांच्या प्रेरक विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. जयदीप पाटील (अध्यक्ष, नोबेल फाउंडेशन)
डॉ. जयदीप पाटील यांनी सांगितले की, “यश हे फक्त पदावर नाही, तर लोकांच्या जीवनात बदल घडविण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. समाजासाठी कार्य करणे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगणे.” त्यांनी मराठी लाईव्ह न्युजच्या सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक केले.
डॉ. डिगंबर महाले (प्रदेश सरचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया)


डॉ. महाले म्हणाले, “पत्रकारिता ही समाजातील परिवर्तनाची शक्ती आहे. माध्यमे जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात, तर समाजातील प्रत्येक घटक प्रेरित होतो. शब्दात ताकद असते — म्हणूनच शब्द वापरताना विवेक आणि संवेदनशीलता आवश्यक आहे.”
डी. वाय. एस. पी. वासुदेव देसले (पोलीस अधिकारी)
वासुदेव देसले यांनी सांगितले की, “प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हेच यशाचे खरे सूत्र आहे. समाजाची सुरक्षा आणि न्याय देण्याची जबाबदारी केवळ पोलीस दलाची नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या पातळीवर जबाबदारी पार पाडली पाहिजे.”
डॉ. अविनाश जोशी (अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ)
डॉ. जोशी यांनी सांगितले की, “ज्ञान, संस्कार आणि विचार ही तीन मूल्ये जपल्यास समाज सदृढ राहतो. वाचन आणि लेखनातून व्यक्तिमत्व घडते आणि संस्कृती बळकट होते.”
मयूरजी पाटील (शाखा प्रबंधक, युनियन बँक)
मयूरजी पाटील यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “शिक्षणाबरोबर आर्थिक जाण असणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आर्थिक नियोजन आणि बचत ही केवळ पैशाची नव्हे, तर जबाबदार जीवनाची गुरुकिल्ली आहे. तरुण पिढीने स्वतःचा विकास करताना समाजाच्या प्रगतीसाठीही योगदान दिले पाहिजे.”
त्यांनी मेहनत, प्रामाणिकता आणि शिस्त यांना यशाचे तीन स्तंभ मानले व उपस्थित युवकांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला
या सर्व मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यक्रमाचे वातावरण ऊर्जावान बनले. विशेष म्हणजे, महिला बंधू-भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती, ज्यांनी सभागृहात उत्साह आणि सकारात्मकता निर्माण केली.
जेष्ठ पत्रकार प्रा. बी. एन. चौधरी (कार्यक्रमाध्यक्ष)
ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक प्रा. बी. एन. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “पत्रकारिता म्हणजे समाजाचे आरसे — जो समाजातील वास्तव प्रतिबिंबित करतो. सत्य, जबाबदारी आणि संवेदनशीलता या पत्रकाराच्या कार्याचे तीन मुख्य स्तंभ आहेत.” त्यांनी युवकांना विचारांची दिशा देणारे कार्य करण्याचे आवाहन केले.
उत्कृष्ट सुत्रसंचालन सौ वसुंधराताई लांडगे यांनी केले.प्रस्ताविक पत्रकार ईश्वर महाजन यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक,मित्रपरिवार, संघटनेचे अध्यक्ष, जेष्ठ बांधव,भगिनी, वाचक,जाहिरातदार, पत्रकार, वाचनालयाचे संचालक मंडळ, कर्मचारी,
सर्व सहकार्यकर्त्यांचे मुख्य संपादक ईश्वर आर. महाजन यांनी मनःपूर्वक आभार मानले.


