अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी
![]()
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी
अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यात 26 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे कापूस, मका, पपई, निंबू, केळी, सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला असून, शासनाकडून तातडीने पंचनामे करून अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळावी, अशी मागणी किसान काँग्रेस संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव यांनी
आज तहसीलदार अमळनेर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.
या प्रसंगी तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपले नुकसानग्रस्त शेत दाखवत कापसाच्या बोंडांना आलेली कोम, मक्याच्या शेंड्यांवर पावसाने झालेली कुज आणि इतर पिकांची दुरवस्था प्रत्यक्ष दाखवून दिली. पंचनामे करण्याची मागणी ऐकल्यानंतर तहसीलदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून प्रत्यक्ष स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
तथापि, अधिकाऱ्यांनी दौरे सुरू केले असले तरी काही ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत राहून स्वतःच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून घ्यावा, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.
निवेदन देतांना किसान काँग्रेस संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील,
सुरेश दादा, धनगर अण्णा, विश्वास आबा, प्रताप आबा, विजय पाटील, दिनेश पाटील, भगवान संदनशिव, घोलप सर, राजेंद्र चिंधा पाटील, गोकुळ पाटील, छोटू पाटील, सुनील पाटील, मयूर पाटील, न्हानभाऊ पाटील, मधु दादा, दिलीप बापू, विठ्ठल पवार यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी वर्गाने शासनाने तातडीने निर्णय घेऊन नुकसानभरपाईसाठी निधी वितरित करावा, अशी एकमुखी मागणी केली असून, जर मदत लांबली तर शेतकरी आक्रोश व्यक्त करतील, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली.

