गाव एकत्र, श्रमदानातून विकासाची नवी दिशा! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ ग्रामस्थांचा सामूहिक सहभाग; वनराई बंधाऱ्याच्या बांधकामातून एकजुटीचा सुंदर संदेश
![]()
गाव एकत्र, श्रमदानातून विकासाची नवी दिशा!
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ ग्रामस्थांचा सामूहिक सहभाग; वनराई बंधाऱ्याच्या बांधकामातून एकजुटीचा सुंदर संदेश
अमळनेर प्रतिनिधी(जगदीश पाटील सर)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कोंढावळ येथे गावात लोकचळवळ उभी करत गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानाचा उपक्रम राबविला. पूर्वी ‘पाणी फाउंडेशन’च्या कार्यात मिळालेला अनुभव लक्षात ठेवत याही वेळी ग्रामस्थांनी एकजुटीने वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करून जलसंधारणाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
या उपक्रमात बचत गटातील महिला, शेतकरी गट, महिला मंडळ, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, गावातील मित्रमंडळ, भजनी मंडळ, विकास सोसायटी चेअरमन व सदस्य, तसेच सर्व समाजातील घटकांनी उत्साहात सहभाग घेतला.
या सामूहिक प्रयत्नामुळे गावाच्या शिवारातील पाणलोट क्षेत्रात वाढ होऊन शेतीसाठी पाणी उपलब्धतेत सुधारणा होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. प्रत्येक कामात अशीच एकजूट दाखवत राहू, असा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

