शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरात धडक आक्रोश मोर्चा — १५ ऑक्टोबरला शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय!
![]()
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरात धडक आक्रोश मोर्चा — १५ ऑक्टोबरला शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय!
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी किसान काँग्रेस संघटनेच्या वतीने प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑक्टोबर, बुधवार रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यातून शासनाकडे अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ₹५०,००० मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ७/१२ कोरे करावेत, खरीप हंगामातील पिकांसाठी पीकविमा मंजूर करण्यात यावा, २०२१ च्या अतिवृष्टीचे उर्वरित अनुदान तातडीने वितरित करावे, एम.एस.पी. प्रमाणे भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करावे तसेच कापूस खरेदी त्वरित सुरू करण्यात यावी अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा ठणकावून आग्रह धरला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रा. सुभाष पाटील यांनी आवाहन केले आहे की या मोर्चात प्रत्येक शेतकरी, नातेवाईक, मित्र, शेजारी आणि युवकांनी सहभागी व्हावे, मोर्च्यात जितकी डोकी जास्त तितका प्रभाव अधिक; कारणे न सांगता, हक्कासाठी या. “तुम्ही आला म्हणजे आमची छाती फुगून जाते, म्हणून सर्वांनी या,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी शेतकऱ्यांना एकजुटीने हक्कासाठी रस्त्यावर उतरावे असे सांगितले आहे.

