अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम वाया – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी : किसान काँग्रेस
![]()
अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम वाया – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी : किसान काँग्रेस
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पेरणीनंतर लगेचच पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर तब्बल २२ दिवस पावसाने दडी मारल्याने मुग, उडीद, सोयाबीन, मका ही पिके पूर्णतः वाया गेली.
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सतत पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष सुकलाल पाटील यांनी शासनाकडे अमळनेर तालुका तसेच जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या वेळी पदाधिकारी श्री. सुरेश पिरन पाटील, श्री. धनगर दला पाटील, श्री. दिनेश पवार, किशोर पाटील, राजीव पाटील, श्रीधर विष्णु चौधरी, अविनाश मुकुंदराव भालेराव, देवेंद्र पाटील, राहुल भालेराव आणि परवेज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उपजीविका संकटात आली असून, शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदत करावी अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

