अमळनेरच्या तिरंगा चौकात मेहनतीच्या चवीने रंगली ‘स्वाभिमानाची पाणीपुरी’
![]()
अमळनेरच्या तिरंगा चौकात मेहनतीच्या चवीने रंगली ‘स्वाभिमानाची पाणीपुरी’
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
अमळनेर शहरातील तिरंगा चौक परिसरात नुकतीच उभारलेली “स्वामी समर्थ चाट अँड पाणीपुरी” ही गाडी लोकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पण या गाडीमागे आहे कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाने सजलेली एक प्रेरणादायी कहाणी.
साध्या, सरळ आयुष्यातील संघर्ष अंगीकारत, अनेक वर्षे शेतात मजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या सौ. संध्या योगेश मोरे यांनी आज स्वतःच्या पायावर उभे राहत व्यवसायाचा नवा अध्याय सुरू केला आहे.
“एखाद्याच्या नशिबी कष्ट असतातच… पण जो कष्ट करतो, त्याला देवही साथ देतो. आई-वडिलांचे व सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद हेच माझं भांडवल आहे,” असं आत्मविश्वासाने सांगणाऱ्या संध्या मोरे यांच्या डोळ्यात आशेची चमक दिसून येते.
ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणाऱ्या या पाणीपुरीत फक्त स्वाद नाही, तर मेहनतीचा गोडवा मिसळलेला आहे. पहिला घास घेताच ग्राहक पुन्हा पुन्हा ऑर्डर करतात, हेच त्यांच्या व्यवसायातील यशाची खूण आहे.
संध्या मोरे या साई इंग्लिश अकॅडमीच्या पालक असून त्यांच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. शेतातील घाम गाळल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही, उलट नव्या क्षेत्रात पाऊल टाकत आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडला.
तिरंगा चौकातील “स्वामी समर्थ चाट अँड पाणीपुरी” ही गाडी आज परिसरातील चर्चेचा विषय ठरत असून, संध्या मोरे यांच्या जिद्दीचा हा प्रवास आणखी मोठ्या यशाकडे नेईल, असा विश्वास इंग्लिश अकॅडमी चे संचालक भैय्यासाहेब मगर व अँड सौ मगर यांनी व्यक्त केला आहे.

