तंबाखूमुक्त शाळा अभियानास गती – जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा
![]()
तंबाखूमुक्त शाळा अभियानास गती – जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा
अमळनेर प्रतिनिधी– जिल्हा परिषद जळगाव(शिक्षण विभाग), तंबाखू नियंत्रण कक्ष (जिल्हा रुग्णालय जळगाव) आणि सलाम मुंबई फाउंडेशन व आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त कार्यशाळा जिल्हा परिषद, जळगाव येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियानातील ९ निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सौ. कल्पना चव्हाण यांनी केले.
या कार्यशाळेत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, प्रत्येक तालुक्यातून ५ तज्ञ मार्गदर्शक शिक्षक,आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना उद्देशून मार्गदर्शन करताना सलाम मुंबई फाउंडेशनचे श्री. राकेश कसारे यांनी सांगितले की, तंबाखूमुक्त शाळा अभियानाची अंमलबजावणी करताना शाळा परिसर व १०० मीटरच्या हद्दीत तंबाखू व गुटखा विक्रीस पूर्णपणे मनाई करणे, शाळा परिसरात तंबाखू सेवनास मनाई ठेवणे, तंबाखू नियंत्रणासाठी शाळेत विशेष समिती स्थापन करणे, विद्यार्थ्यांना तंबाखूविषयक शिक्षण देणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्त धोरणाचे पालन करणे, शाळेत तंबाखूविरोधी फलक लावणे, तंबाखू सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, पालकांना जागृती उपक्रमात सहभागी करणे आणि अभियानाचा वार्षिक आढावा घेणे हे निकष काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
सलाम मुंबई फाउंडेशनचे श्री. राकेश कसारे यांनी या सर्व निकषांवर सविस्तर माहिती देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. व तंबाखू नियंत्रण कक्षाच्या मानसोपचार तज्ञ श्रीमती. निशा कटरे यांनी तंबाखूची सद्य स्थिती यावर आणि व्यसन सोडवण्यासाठी करावयाचा परिहार या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राज मोहम्मद शिकलकर यांनी केले तसेच कार्यक्रमाला मा. डायट प्राचार्य श्री. अनिल झोपे, मा. उपशिक्षणाधिकारी सौ. स्वाती येवले, मा. सौ. दामिनी अनिल चौधरी, श्री. ऋषिकेश संपत पाटील, श्री. अनिल मधुकर दळवी, श्री. नरेंद्र चौधरी, श्री. विजय सरोदे, सौ. प्रतिभा सानप आणि मा. गटविकास अधिकारी सौ. सरला पाटील व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ.शिवानी सिंह उपस्थित होते.
सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे श्री. राकेश कसारे*, तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक सौ. रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक श्री. दीपक संदानशिव, सौ. क्रांती बेसाणे आणि श्री. समाधान अहिरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

