शिरुडच्या विद्यार्थ्यांची एसटी बस थांबण्याची मागणी; शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दिले आगार प्रमुखांना निवेदन
![]()
शिरुडच्या विद्यार्थ्यांची एसटी बस थांबण्याची मागणी; शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दिले आगार प्रमुखांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
तालुक्यातील शिरुड येथे एसटी महामंडळाच्या बस थांबण्यास नकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिरुडच्या अनेक विद्यार्थ्यांना अमळनेर गाठणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बस थांबत न असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेत वेळेवर पोहचण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक विद्यार्थी बसच्या येण्याच्या वेळेस पळतात, पण चालक वेग वाढवून बस पळवून नेतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण होतो. हे सर्व परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांना घरचा रस्ता चालत जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थ्यांनी एसटी पासेस काढले असले तरी देखील खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
हि समस्या सोडवण्यासाठी शिरुड ग्रामपंचायतीने व उपसरपंच कल्याणी पाटील यासह विद्यार्थ्यांनी
अमळनेर आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. निवेदनात कळवले आहे की, शिरुड व कावपिंप्री येथील सुमारे 100 ते 150 विद्यार्थी शिक्षणासाठी अमळनेर शहरात जातात, आणि बसच्या गर्दीच्या वेळी थांबण्याची गरज आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने ही समस्या अत्यंत गंभीर आहे.

