अश्रूंना दिली सेवाभावाची वाट! , दुःखाच्या प्रसंगातील खर्च वळवून शेतकरीपुत्रांच्या शिक्षणासाठी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचा संवेदनशील पुढाकार
![]()
अश्रूंना दिली सेवाभावाची वाट!
दुःखाच्या प्रसंगातील खर्च वळवून शेतकरीपुत्रांच्या शिक्षणासाठी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचा संवेदनशील पुढाकार
अमळनेर प्रतिनिधी :
‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’ या भावनेतून पाळधी येथील सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पाळधी पोद्दार नोबल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या चेअरमन डॉ. सौ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांचे सासरे कै. भगवानराव सूर्यवंशी यांचे निधन झाले. त्यांच्या दहाव्या व इतर विधींवर होणारा खर्च न करता तोच निधी समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचा निर्णय डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी घेतला. कै. भगवानराव सूर्यवंशी यांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दुःखाच्या प्रसंगाला समाजसेवेची दिशा देत त्यांनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर ‘एखाद्याच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आपल्या आनंदाचा काही भाग देणे’ हा माणुसकीचा संदेशही दिला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण थांबू नये, त्यांच्या भविष्यात आशेचा किरण कायम राहावा, या भावनेतून ही मदत करण्यात आली.
यावेळी पोद्दार इंग्लिश मीडियम च्या चेअरमन
डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचे पती पोद्दार इंग्लिश मीडियम चे विश्वस्त प्रशांत सूर्यवंशी, भरारी फाउंडेशनचे दिपकदादा परदेशी, रत्नाकर पाटील, पर्यावरणप्रेमी वसंत पाटील यांच्यासह विविध सहकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. गरजू घटकांच्या मदतीसाठी अशा संवेदनशीलतेने पुढे येणे ही समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी “समाजहितासाठी आम्ही सदैव सोबत राहू,” असे आश्वासन दिले.
कै. भगवानराव सूर्यवंशी यांच्या स्मृतींना समाजोपयोगी कार्याची जोड देत एका कुटुंबाच्या दुःखातून अनेक मुलांच्या भविष्यासाठी आशेची वाट निर्माण करण्याचा हा प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

