विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील**, १५ शिक्षकांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान
![]()
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील**
१५ शिक्षकांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान
*जळगाव प्रतिनिधी
शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारा घटक नसून त्यांच्या जडणघडणीला आकार देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा आणि आयुष्याला योग्य दिशा देणारा आधार आहे. बदलत्या काळात शाळांची पटसंख्या वाढविणे आणि टिकविणे हे आज शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे; मात्र हे आव्हान समर्थपणे पेलण्याची ताकदही आपल्या शिक्षकांमध्येच आहे. तंत्रज्ञानातून माहिती सहज उपलब्ध होऊ शकते; मात्र विद्यार्थ्यांना प्रेरणा, संस्कार आणि माणुसकीची शिकवण देण्याची खरी ताकद शिक्षकातच आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ धडे शिकविण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘भविष्याचे शिल्पकार’ बनावे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने जळगाव येथील भैयासाहेब गंधे हॉल, ला. ना. हायस्कूल येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
*पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शाळांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढणे हेच शाळेचे खरे वैभव आहे. काळ बदलतोय, तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे; पण “कितीही 5G-6G येऊ द्या, गुरुजींशिवाय पर्याय नाही!” असे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची बंद असलेली आगाऊ वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांनी काळानुसार अद्ययावत राहून गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम पिढी घडवावी, असे आवाहन करत त्यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.*
यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात समस्या आहेत; मात्र त्या समस्यांचे निराकरण करून यश संपादन करण्यात मोठा विजय आहे. सध्याच्या काळात मोबाईलमुळे संवाद हरपत चालला असून या काळात शिक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार अनिल पाटील म्हणाले की, एआयचा प्रत्येक क्षेत्रात वापर वाढला आहे. शिक्षण क्षेत्रातही एआयमुळे नवी क्रांती घडत आहे. पालक शिक्षकांच्या भरवशावरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असतात. त्यामुळे नवी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे.
आमदार राजूमामा भोळे यांनीदेखील यावेळी आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक ही नोकरी नसून जबाबदारी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनीदेखील आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जळगाव जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘निपुण भारत’ या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या शाळा कशा प्रगती करीत आहेत, याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पुरस्कारप्राप्त गिरीश महाजन व मनीषा शिरसाठ या दोन शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.
*जि. प. च्या या शिक्षकांचा झाला गौरव*
यावेळी जिल्ह्यातील १५ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये योगेश्वर पाटील (आटोळे, ता. अमळनेर), विलास माळी (महिंदळे, ता. भडगाव), ईश्वर मंडावरे (येवती, ता. बोदवड), नीलेश पाटील (महादेव माळ, ता. भुसावळ), प्रभाबाई पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), हरि बाविस्कर (कुरवेल तावसे बु., ता. चोपडा), मनीषा शिरसाठ (पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव), सोनाली बोरसे (आडगाव, ता. एरंडोल), मनीषा मारकड (भोकर, ता. जळगाव), जुगलकिशोर ढाकरे (रांजणी, ता. जामनेर), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर), संजू राठोड (नाचणखेडा, ता. पाचोरा), स्मिता देसले (कराडी, ता. पारोळा), दीपक कोडे (कुसुंबे, ता. रावेर) आणि गिरीश महाजन (हिंगोणे, ता. रावेर) यांचा समावेश आहे.


*यांची होती उपस्थिती*
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, शिक्षणप्रेमी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत जिल्हा शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया आणि पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नाना पाटील यांनी केले, तर उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी आभार मानले.

