साखर आयातीवरून माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांचा केंद्रावर सवाल , ‘जागृती अभियान’च्या माध्यमातून शेतकरी व साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
![]()
साखर आयातीवरून माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांचा केंद्रावर सवाल
‘जागृती अभियान’च्या माध्यमातून शेतकरी व साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
अमळनेर प्रतिनिधी: शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांनी देशातील साखर उत्पादन आणि साखर आयातीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या धोरणावर सवाल उपस्थित केला आहे. ‘जागृती अभियान’च्या माध्यमातून त्यांनी साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि देशाच्या आर्थिक धोरणाकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
भारत हा ब्राझीलनंतर जगातील प्रमुख साखर उत्पादक देश असून, असे असताना देशाला मोठ्या प्रमाणात साखर आयात करण्याची वेळ का आली, असा थेट प्रश्न डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे. “साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असताना आता दहा लाख टन साखर आयात करण्याची गरज का निर्माण झाली?” असा सवाल त्यांनी केला.
साखर आयातीमुळे देशातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि संपूर्ण साखर उद्योगावर त्याचा काय परिणाम होणार, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. देशात पुरेसे उत्पादन असताना आयातीचा निर्णय घेतला जात असेल, तर त्यामागील धोरण काय आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने जनतेसमोर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“हाच का आपला विकसित भारत देश?” असा सवाल करत डॉ. बी. एस. आबा पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, बाजारपेठेत स्थैर्य राखणे आणि ऊस उत्पादकांना योग्य मोबदला मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर आयातीच्या निर्णयाचा शेतकरी आणि साखर उद्योगावर होणारा परिणाम याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत शेतकरीहिताच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


