लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
![]()
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
अमळनेर ( प्रतिनिधी ) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेचा विचार आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे, त्यांनी कधीही समरस तेला महत्व दिले नसून समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा वक्त्या सुनिता मोरे यांनी केले.
येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या वतीने आज शहरातील साने गुरुजी शाळेत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आप्पासो. गुणवंतराव गुलाबराव पाटील होते.
आपल्या व्याख्यानात सुनीता मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय व स्वाभिमानाची प्रेरणा दिल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेची मूल्ये जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला संचालक ॲड. अशोक बाविस्कर, पत्रकार किरण पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, उप मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षक प्रतिनिधी जगताप सर उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

