पांझरा नदीवर केटीवेअर बंधाऱ्यांची मागणी; अमळनेर–मांडळ–मुडी मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन ,पाणी अडवा–पाणी जिरवा अभियानाला चालना देण्याची मागणी; ग्रामीण भागातील वाहतूक, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
![]()
पांझरा नदीवर केटीवेअर बंधाऱ्यांची मागणी; अमळनेर–मांडळ–मुडी मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
पाणी अडवा–पाणी जिरवा अभियानाला चालना देण्याची मागणी; ग्रामीण भागातील वाहतूक, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पाणीटंचाई व ग्रामीण रस्त्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. १२ जुलै, रविवार) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पांझरा नदीवरील मांडळ, मुडी व शहापूर परिसरात केटीवेअर (KT Weir) बंधारे उभारून पाणी अडविण्याची तसेच अमळनेर–ढेकू–शिरसाळे–तरवाडे–वावडे–मांडळ ते मुडी या मार्गावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सिमेंट काँक्रीट ट्रिमिक्स रस्ता बांधण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मा. सभापती पंचायत समिती अमळनेर डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील तसेच धुळे जिल्ह्याचे शिवसेना नेते श्री. आण्णासो हिलाल माळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, पांझरा नदीवर केटीवेअर बंधारे उभारल्यास पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविले जाईल, भूजल पातळीत वाढ होईल, विहिरी व बोअरवेलना पाणी उपलब्ध राहील आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळेल. तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्याही कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय अमळनेर ते मुडीदरम्यानचा रस्ता अनेक गावांसाठी जीवनवाहिनी असून या मार्गावरून नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यापारी दररोज प्रवास करतात. रस्त्याची दुरवस्था असल्याने अपघातांचा धोका वाढत असून वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दर्जेदार सिमेंट काँक्रीट ट्रिमिक्स पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनाची दखल घेत पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत, दोन्ही कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या महत्त्वाच्या मागण्या लवकर पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

