के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
जळगाव, दि. २६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि लोककल्याणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहू महाराज यांच्या लोकाभिमुख कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये अंगीकारावीत, असे सांगितले.
यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. निबंध स्पर्धेत केतन गिरीश पाटील याने प्रथम क्रमांक, कौशल रविंद्र आमोदकर ने द्वितीय क्रमांक, तर कु. मानवी अरविंद पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच चित्रकला स्पर्धेत कु. प्रगती गजानन जेऊघाले हिने प्रथम क्रमांक, कु. कनिष्का अशोक बंजारा हिने द्वितीय क्रमांक, तर जिग्नेश मिलिंद ढाके याने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते सादर केली. त्यांच्या शिक्षणप्रेम, सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि समतेच्या विचारांचा प्रभावी आढावा विद्यार्थ्यांनी मांडला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार, श्रीमती वर्षा चौधरी श्री. निर्मल चतुर, श्री. बिपिन झोपे, श्रीमती सुचिता बाविस्कर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शेवटी उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेच्या व शिक्षणप्रेमाच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समतेची भावना आणि शिक्षणाबद्दलची प्रेरणा अधिक दृढ झाली.

