मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध धोक्यात- डॉ.रेणुका चव्हाण
![]()
मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध धोक्यात- डॉ.रेणुका चव्हाण
जळगांव प्रतिनिधी
सध्याच्या काळात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन न राहता जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. मात्र सध्याची तरुणाई याच्या आहारी गेल्याचे दिसून येते आणि परिणामी कुटुंबातील सुसंवाद कमी झाल्याचे लक्षात येते. कुटुंब व्यवस्था या मोबाईलच्या लाडामुळे संकटात सापडल्याचे अनेक उदाहरणे आपण नित्यजीवनात वाचत, ऐकत असतो असे प्रतिपादन डॉ.रेणुका चव्हाण यांनी केले. त्या खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी “वाढलेला स्क्रीन टाईम आणि घटलेली नाती” या विषयावर बोलत होत्या.
विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा डॉ.श्रद्धा पाटील यांनी मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की,कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान आणि इतर विषयांचा कार्यकारणभाव त्यांच्या लक्षात यावा यासाठी महाविद्यालयात विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. रेणुका चव्हाण यांनी मोबाईलचा अतिवापर शरीरासाठी कसा आणि किती घातक आहे हे स्पष्ट करताना डोळ्यांची नेहमी तपासणी करणे, संगणकावर काम करताना कॉम्प्युटर आय ग्लास किंवा ब्लू ब्लॉक चष्मा वापरणे, डोळ्यांची ठराविक वेळेनंतर उघडझाप करणे डोळ्यातील शुष्कपणा कमी करण्यासाठी अधिकाधिक पाणी पिणे, डोळ्यांचे नियमित व्यायाम करणे तसेच अ, ब आणि ई जीवनसत्त्वांचा समावेश असलेले अन्नपदार्थ व फळांचा दैनंदिन आहारात समावेश करीत जंक फूड खाणे टाळण्याचा आणि पुरेशी झोप घेण्याचा मौलिक सल्ला याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या प्रा.राजश्री महाजन होत्या.यावेळी पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, समन्वयक प्रा. उमेश पाटील,प्रा.गुणवंत वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.किरण महाजन यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. प्रा.विनोद वैदकर, प्रा.राजेंद्र निकुंभ,प्रा.दिनेश महाजन,प्रा. प्रज्ञा पाटील,प्रा. शीतल काळे,प्रा.प्रमोद भोई, प्रा.कांचन चौधरी, प्रा.चारुलता बेंडाळे, शिक्षकेतर कर्मचारी सुरेश जावळे, अजय काळे,विजय जावळे, चेतन वाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

