महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या तयारीला वेग ,टिळक भवन, मुंबई येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय समितीची बैठक संपन्न; सखोल मतदार पुनरिक्षणावरही भर
![]()
महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या तयारीला वेग
टिळक भवन, मुंबई येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय समितीची बैठक संपन्न; सखोल मतदार पुनरिक्षणावरही भर
मुंबई प्रतिनिधी :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी नियुक्त राज्यस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील टिळक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. याचबरोबर राज्यातील सखोल मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींची विशेष बैठकही आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आगामी काळात महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महात्मा फुले यांनी समाजातील शोषित, वंचित, बहुजन घटकांसाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
तसेच राज्यातील मतदार पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, नवमतदार नोंदणी, नाव दुरुस्ती व मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी जनतेशी थेट संपर्क वाढवावा, अशा सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विविध विभागांचे पदाधिकारी, जिल्हास्तरीय प्रतिनिधी तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक बापू खलाणे यांनीही या बैठकीस उपस्थित राहून पक्षाच्या विविध विषयांवर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीमुळे काँग्रेस पक्षाच्या आगामी सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांना नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

