गरिबीवर मात करत मयुरीची भरारी, कु. मयुरी घाळे हिची दहावीत ९५.४०% गुणांसह उज्वल कामगिरी
![]()
गरिबीवर मात करत मयुरीची भरारी
कु. मयुरी घाळे हिची दहावीत ९५.४०% गुणांसह उज्वल कामगिरी
संभाजीनगर प्रतिनिधी :
प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत कु. मयुरी उमाकांत घाळे हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मयुरीचे आई-वडील सौ. स्वाती घाळे व श्री. उमाकांत घाळे यांनी अत्यंत कष्टमय परिस्थितीत राहून मुलीच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. कंपनीमध्ये काम करून संसाराचा गाडा ओढताना त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही शिक्षण हेच भविष्य घडवणारे सामर्थ्य असल्याची जाणीव ठेवून त्यांनी मयुरीला सातत्याने प्रोत्साहन दिले.
आई-वडिलांच्या संस्कारांची आणि स्वतःच्या मेहनतीची जोड देत मयुरीने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवले. नियमित अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे तिने दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करत आपल्या कुटुंबाचे नाव अभिमानाने उजळवले आहे.
मयुरीच्या या यशाबद्दल लिट्ल एंजल स्कूलचे शिक्षक सागर राऊत सर, देशमुख मॅडम, प्राचार्या स्वाती पाटकरीन, डॉ. भरतसिंग सलामपुरे यांनी तिचे विशेष कौतुक केले. तसेच स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष मुरलीधर बेडगे, मोहन गिते, अण्णासाहेब गफाट, मोहनसिंग सलामपुरे, रामसिंग सलामपुरे, अमृतसिंग सलामपुरे यांच्यासह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गरिबी ही यशाच्या आड येत नाही, तर मेहनत, जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे मयुरी घाळे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

