अमळनेरात भव्य ‘गौ-सन्मान’ रॅली; गोसंरक्षणासाठी कायद्याची जोरदार मागणी
![]()
अमळनेरात भव्य ‘गौ-सन्मान’ रॅली; गोसंरक्षणासाठी कायद्याची जोरदार मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) :
दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी अमळनेर (जि. जळगाव) येथे गोसंरक्षणाच्या जनजागृतीसाठी भव्य ‘गौ-सन्मान आवाहन अभियान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील गोप्रेमी नागरिक, स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या सहभागामुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रॅलीचे विशेष आकर्षण ठरला तो सुशोभित ‘अहिंसा रथ’. आकर्षक सजावटीमुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत, अहिंसेचा आणि प्राणीसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.
रॅलीदरम्यान सहभागी नागरिकांनी संपूर्ण भारतात गोहत्या बंद करण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा, गायींना ‘माता’चा दर्जा द्यावा, तसेच सर्व पशु-प्राण्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा, अशा ठोस मागण्या मांडल्या.
दुपारी १२ वाजता अमळनेर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर गोप्रेमी स्वयंसेवक व नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या असून त्याची प्रत तहसीलदारांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रपती यांनाही पाठविण्यात आली.
या उपक्रमात करुणा क्लब, अमळनेर शाखेचे संघटक शिक्षक श्री प्रभाकर एस. विंचूरकर, गोकुळ बोरसे तसेच श्री ईश्वर महाजन सर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
संपूर्ण शहरात शांततेत पार पडलेल्या या रॅलीमुळे गोसंरक्षणाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचला असून, नागरिकांमध्ये प्राणीमात्रांविषयी संवेदनशीलता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.

