१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; चर्चेविना मंजुरीवरून वादंग विरोधकांचा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
![]()
१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; चर्चेविना मंजुरीवरून वादंग
विरोधकांचा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेत २० एप्रिल रोजी पार पडलेली सर्वसाधारण सभा अवघ्या १० मिनिटांत आटोपल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सभेत कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा न होता अजेंड्यावरील विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप विरोधी गटातील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, सभेच्या अजेंड्यावर तब्बल २७ विषयांचा समावेश होता. शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असतानाही बैठक सुरू होताच अल्पावधीतच संपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. विरोधी नगरसेवकांना एकही मुद्दा मांडण्याची संधी न देता बैठक समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली व सर्व विषय बहुमताने मंजूर झाल्याचा दावा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर विरोधी गटाने प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत, “सभेतील निर्णय पूर्वनियोजित होते का?” असा सवाल उपस्थित केला आहे. काही नगरसेवकांनी हा प्रकार लोकशाही पद्धतीला बाधक असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रकरणी चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर विकास आघाडी व अपक्ष नगरसेवकांनी केली आहे. या मागणीमध्ये राजू फाफोरेकर, भरतकुमार ललवाणी, देवेंद्र कांबळे, सचिन पाटील, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील, योगिता सयाजीराव कापडणे, अफसाना मुक्तार खाटीक, जुबेदाबी हाजी नसीर, कविता विजय राजपूत, शोभाबाई गढरे, नंदाताई नरेंद्र संदानशिव, विजय कहारु पाटील आदींचा समावेश आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, पुढील घडामोडीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

