नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड!
![]()
नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड!
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने आपल्या उल्लेखनीय यशाने शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत त्याने 98.75 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली आहे.
विशेष म्हणजे, हितांशने सैनिकी शाळेच्या प्रवेश प्रक्रियेतही उल्लेखनीय कामगिरी करत 300 पैकी तब्बल 235 गुण मिळवले असून त्यासाठीही त्याची निवड झाली आहे. त्याच्या या दुहेरी यशामुळे परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेला हितांश हा अत्यंत अभ्यासू, मेहनती व जिज्ञासू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. शालेय जीवनात तो नेहमीच शैक्षणिक तसेच इतर उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
हितांशच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संजीव पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे विशेष अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हितांशच्या या उल्लेखनीय यशामुळे साने गुरुजी विद्यामंदिर शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचीही प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

