गीतेतील तत्त्वज्ञानानुसार जीवन जगावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
![]()
गीतेतील तत्त्वज्ञानानुसार जीवन जगावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
उरुळी कांचन (राम मंदिर): भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये मनुष्याचे कर्म , धर्म काय असावे याबद्दल विवेचन केलेले आहे. गीतेमध्ये परमात्मा, सृष्टी, जीव, कालचक्र व कर्म याचे ब्रह्मज्ञान विशद केलेले आहे. त्याचप्रमाणे गीतेमध्ये कर्मयोग ,भक्तीयोग, ज्ञानयोग व समत्व भाव शिकविला आहे. गीतेतील तत्त्वज्ञान हे अध्यात्मिक तर आहेच पण मानसिक आरोग्य व जीवन जगण्यासाठी एक शास्त्र आहे. जीवन जगत असताना मनुष्याने धर्म, नीती, न्याय, विवेक ,सद्बुद्धी, व सत्य आचरण्यात आणण्याचे तत्त्वज्ञान गीता शिकविते, व तेथेच मनुष्याचा जय होतो. तर अनीती,अन्याय, अधर्म, अविवेक, दुर्बुद्धी ,असत्याने वागणाऱ्या व्यक्तींचा नायनाट होतो हे त्रिकाल बाधित सत्य परमेश्वरांनी गीतेमध्ये सांगितले आहे. म्हणून शहाण्या माणसाने गीतेतील तत्त्वज्ञानानुसार जीवन जगावे असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथे श्री उरुळी कांचन देवस्थान संस्था, भैरवनाथ सेवा समिती, ग्रामपंचायत उरुळी कांचन, श्रीराम जन्मोत्सव समिती समस्त ग्रामस्थ आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उरुळी कांचन येथील जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे मार्गदर्शन करताना आपल्या प्रवचनात डॉक्टर रवींद्र भोळे म्हणाले की भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी केल्यामुळे पांडवांचा विजय झाला. दुष्ट प्रवृत्तीने वर्तणूक केल्यामुळे कौरवांचा पराजय झाला. भक्ती पूर्वक गीतेचे चिंतन, मनन, अध्ययन केल्यास परमानंद सु ख प्राप्त होऊन दिव्यत्वाची प्रचिती येते. तसेच जिथे धर्म असेल तेथे जय होतो. धर्म हे मनुष्याचे रक्षण करतात. अधर्माचा नाश ठरलेला असतो असे ते म्हणाले. याप्रसंगी ह भ प तुकाराम कांचन, ह भ प सुरेश कांचन, ह भ प पुंडलिक कांचन, ह भ प रोहित मुरकुटे ,नाना कोंडे, प्रमिलाताई तळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त या सप्ताहामध्ये सर्वस्वी अक्षय महाराज रोडे, नाना महाराज काळे, नीताताई महाराज कांचन, सुनिता ताई महाराज कुंजीर, प्रमिलाताई महाराज तळेकर, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे महाराज यांची प्रवचने झाली. तर संभाजी महाराज आपुणे, डॉ. तुकाराम महाराज उराळे, सुनील महाराज शिंदे, भारतीताई महाराज गाडेकर, बाळू महाराज आहेर, गणेश महाराज भगत, शारदाताई सूर्यवंशी महाराज, गणेश महाराज पाटील, बाळकृष्ण महाराज डांगे, रमेशानंदजी महाराज जाधव यांची कीर्तने झालेत. पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त गावकरी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.

