बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर अशोक सम्राट जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा संदेश; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
![]()
बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर
अशोक सम्राट जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा संदेश; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
एरडोल प्रतिनिधी
चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी संपन्न झाली. पूज्य भदंत महाथेरो सुगतानंद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पूज्य भदंत नागसेन यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. एरंडोल येथे सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. श्रावस्ती पार्क येथे वास्तव्यास असलेले साहित्यिक भरत शिरसाट सर यांच्या प्रयत्नातून सदर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पूज्य भदंत सुगतानंद यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले. सम्राट अशोक यांनी 84 हजार बौद्ध स्तूप आणि विहार बांधून धम्माची क्रांती घडवून आणली असून आज भारताच्या तिरंग्यावर सम्राट अशोक यांचे धम्मचक्र आहे तसेच चार सिंह असलेली सम्राट अशोक यांची राजमुद्रा देशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे, असे आपल्या मनोगतातून पूज्य भदंत सुगतानंद यांनी मत व्यक्त केले. पूज्य भदंत नागसेन यांनी सम्राट अशोक यांचे धम्मकार्यातील योगदान विशद करत धम्मदेसना दिली.
समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक साहित्यिक भरत शिरसाट सर यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये बौद्ध धम्माची पताका जगात फडकाविली. त्यासाठी आपले पुत्र महेंद्र आणि संघमित्रा यांना दान केले. 21000 धम्म अभ्यासक भंतेंना देश- विदेशात धम्मप्रसारासाठी तयार केले. मानवाचे कल्याण हे युद्धात नसून बुद्धात आहे, त्यामुळे सम्राट अशोकाने आपला बौद्ध धम्म हा आपला राजधर्म बनवला. तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिला पाहिजे म्हणून तिसरी धम्म संगती पाटलीपुत्र येथे इसवी सन पूर्व 250 मध्ये घडवून आणली. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता सम्राट अशोक यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यामुळे सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी झाली पाहिजे तसेच पुढील वर्षी सम्राट अशोक यांची जयंती ही मिरवणुकीसह काढली जाईल, अशी घोषणा सुद्धा भरत शिरसाठ सर यांनी केली. प्राध्यापक डॉक्टर संदीप कोतकर डॉक्टर यांनी सम्राट अशोकाचे देशाच्या जडणघडण मध्ये असलेले योगदान तसेच धम्मा करिता केलेले कार्य सविस्तरपणे मांडले. डाॅ. शुभम जाधव व अण्णाभाऊ सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून सम्राट अशोक यांचे धम्मकार्यातील योगदानाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक नरेंद्र गायकवाड व मुकिंदा सावळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉक्टर संदीप कोतकर यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार सर, प्राध्यापक नरेंद्र तायडे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भाऊ बिऱ्हाडे, बाबुराव भगत, चिंतामण जाधव सर, धम्मज्योती हिरे, मनीषा जाधव, प्राध्यापक उमेश सूर्यवंशी, वर्षा भरत शिरसाठ, भगवान ब्रम्हे मीनाताई ब्रम्हे, कमलताई जाधव, लताबाई ब्राह्मणे, नाना अहिरे, सुभाष अमृतसागर सर, मनोज नन्नवरे सर, प्राध्यापक विजय गाढे, गौतम सोनवणे, रघुनाथ सपकाळे, सुरेखा सोनवणे, पुनम आगळे, अंजली कोतकर इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा शिरसाठ, अनवर दादा, जगदीश पवार, मुकेश ब्राह्मणे, मुकिंदा सावळे, राणीताई बोडरे, मालताबाई बोडरे आणि उषाताई बोडरे यांनी परिश्रम घेतले.


