खानदेशात पन्नासहुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मिळणार UPSC,MPSC,JEE,NEET परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण., निवास, भोजन,पुस्तके ही मिळणार विनामूल्य सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प
![]()
खानदेशात पन्नासहुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मिळणार UPSC,MPSC,JEE,NEET परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण.
निवास, भोजन,पुस्तके ही मिळणार विनामूल्य
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प
अमळनेर प्रतिनिधी- “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”. संत तुकारामांच्या अभंगाच्या या ओवी खऱ्या अर्थाने जगण्याचे कार्य फैजपूर येथील संत परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी आता खानदेशातील पन्नासहून अधिक होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना निवासी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण निशुल्क दिले जाणार आहे.
जळगाव ,धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी थांबावे लागू नये तसेच यांच्या जीवनात यशाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी फैजपूर येथील प्रसिद्ध संत परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पाऊल टाकलेले आहे.आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे जनार्दन हरी जी महाराज शिक्षण क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत.
जळगाव येथील शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना यूपीएससी,एमपीएससी तसेच आयआयटी प्रवेशासाठी जेईई, मेडिकल प्रवेशासाठी नीट या परीक्षांचे निशुल्क मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच भोजनाची सुद्धा निशुल्क व्यवस्था सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे.नुकताच फैजपूर येथे निष्कलंक धाम येथे पार पडलेल्या समारंभात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक प्रवीणभाई पटेल यांनी केली आपल्या वाढदिवसानिमित्त या प्रकल्पासाठी ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी महामंडलेश्वर प.पू.गुरुवर्य श्री.जनार्दन हरिजी महाराज राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजयजी सावकारे, रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे, प. पू. गुरुवर्य श्री मानेकर बाबा शास्त्री, प.पू.महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज प.पू.गुरुवर्य श्री गोपाल चैतन्य महाराजजी, प. पू.गुरुवर्य शास्त्री स्वामी श्री अनंतप्रकाश दासजी,प.पू.प्रविणदास जी महाराज,प.पू.प्रभू कन्हैया दासजी,शास्त्री भक्ती प्रिय दास जी,ह.भ.प.नितीन महाराज मलकापूर,ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर, नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, कॅप्टन राजेंद्र सिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी असणार निवड प्रक्रिया –
पदवीला असणारे तसेच पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी आणि दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल.अशी असेल निवड प्रक्रिया-
▪️परीक्षा- ११ एप्रिल २०२६
केंद्र – जळगाव धुळे नंदुरबार
▪️नोंदणी साठी- nobelfoundation.co.in
9922004193 या क्रमांकावर संपर्क करावा.संपूर्ण खानदेशात प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्ता यादीच्या आधारावर तसेच आर्थिक निकषाच्या आधारावर गरजू परंतु अभ्यासात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीनंतर या प्रकल्पासाठी निवडले जाणार आहे.
फोटो कॅप्शन – सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान प्रकल्पाच्या पोस्टरचे विमोचन करताना परमपूज्य जनार्दन हरी महाराज राज्यमंत्री संजयजी सावकारे, नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील व मान्यवर.

