स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी दिशा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी व्याकरणावर शेखर खैरनार यांचे मार्गदर्शन; गुणवंतांचा बक्षीस देऊन गौरव
![]()
स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी दिशा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठी व्याकरणावर शेखर खैरनार यांचे मार्गदर्शन; गुणवंतांचा बक्षीस देऊन गौरव
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीजचे प्रभावी आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, स्पर्धा परीक्षेची तयारी अधिक भक्कम करण्यासाठी दर रविवारी लेखी परीक्षेची विशेष सराव चाचणीही घेतली जात आहे.
आज पार पडलेल्या मार्गदर्शन सत्रात संकल्प अकॅडमीचे संचालक श्री. शेखर खैरनार यांनी मराठी व्याकरण या महत्त्वाच्या विषयावर सखोल व मुद्देसूद मार्गदर्शन केले. पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या संभाव्य सर्व मुद्द्यांचे सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने विश्लेषण करत त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांचा नेमका अंदाज घेण्यास मदत झाली.
यावेळी टेस्ट सिरीज क्रमांक १३ चा निकाल जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्याख्याते ॲड. शेखर खैरनार, श्री. गोकुळ बोरसे, श्री. किशोर पाटील आणि श्री. मनोरे सर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
निकाल पुढीलप्रमाणे :
मुले :
प्रथम – पाटील दीपक नामदेव
द्वितीय – पवार विनोद अरुण
तृतीय – पाटील हेमंत रामकृष्ण
तृतीय – चौधरी निलेश प्रल्हाद
मुली :
प्रथम – पठाण आफ्रिन
प्रथम – राठोड रिद्धी धनराज
द्वितीय – पाटील अपेक्षा अनिल
तृतीय – पाटील पूजा अनिल
तृतीय – परदेशी प्रिया
यशस्वी विद्यार्थ्यांचे साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार सर तसेच पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देत स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींसाठी ही टेस्ट सिरीज नवी आशा आणि आत्मविश्वास देणारी ठरत आहे.

