“शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किसान काँग्रेसचा पुढाकार; पारोळा तहसील कार्यालयात नुकसानभरपाईसाठी निवेदन सादर”
![]()
“शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किसान काँग्रेसचा पुढाकार; पारोळा तहसील कार्यालयात नुकसानभरपाईसाठी निवेदन सादर”
पारोळा प्रतिनिधी –
पारोळा तालुक्यातील बहादरपूर, शेळावे मंडळ तसेच परिसरातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने पुन्हा एकदा संकट ओढावले आहे. शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, त्यांच्या दुःखाला शासनाने ओळख द्यावी या मागणीसाठी आज किसान काँग्रेसच्या वतीने पारोळा नायब तहसीलदार श्री. अनिल पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी प्रा. सुभाष पाटील, अध्यक्ष – किसान काँग्रेस, जळगाव यांच्या नेतृत्वाखाली Dr. प्रविण पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), रवि बापू (उपसभापती, पारोळा मार्केट समिती), संजय पाटील, दिनेश पवार, राजेंद्र पाटील, संदीप पवार, हेमंत पाटील, तुषार पाटील, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, महेश पाटील तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
नायब तहसीलदार श्री. अनिल पाटील यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, पुढील दोन दिवसांत पंचनामे सुरू होतील असे आश्वासन दिले. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या व प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
प्रा. सुभाष पाटील यांनी यावेळी सांगितले की, “शेतकऱ्यांचा प्रत्येक थेंब घाम हा राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे. अतिवृष्टीने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, आणि जर तातडीने नुकसानभरपाई मिळाली नाही तर तो शेतकऱ्यांवरील अन्याय ठरेल.”
किसान काँग्रेसच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या या आवाजाने प्रशासनाचे लक्ष खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाकडे वेधले आहे.

