“अण्णांचा वारसा जपणारच!” — निसर्डी धरणाला नवसंजीवनी देण्याचा दिपक पाटील वाघोदेकर यांचा निर्धार
![]()
“अण्णांचा वारसा जपणारच!” — निसर्डी धरणाला नवसंजीवनी देण्याचा दिपक पाटील वाघोदेकर यांचा निर्धार
अमळनेर प्रतिनिधी :
कै. धनगर अर्जुन पाटील वाघोदे यांनी शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला निसर्डी धरण प्रकल्प हा त्यांच्या कार्यकाळातील एक ऐतिहासिक उपक्रम मानला जातो. मात्र, त्यांच्या पश्चात या प्रकल्पाकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे धरणाची दुरवस्था झाल्याची खंत शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर कै. अर्जुन पाटील यांचे नातू आणि जानवे–मंगरूळ गटाचे जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदे यांनी नुकतीच धरणावर भेट देऊन पाहणी केली. धरणाच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी सांगितले की, “अण्णांच्या काळात या धरणामुळे शेतांना पाणी मिळून समृद्धी आली होती. मात्र आता धरणाची दुरुस्ती, पाटचारींची देखभाल आणि पांझरा नदीच्या पाण्याची सोय या सर्वांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.”
यावर प्रतिक्रिया देताना दिपक पाटील वाघोदे म्हणाले,
“हे धरण म्हणजे माझ्या अण्णांच्या परिश्रमांचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्याचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. निसर्डी धरण पुन्हा पूर्ववत करणे, त्यातून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणे — हा माझा लढा असेल.”
या पाहणीदरम्यान मार्गदर्शक बापूसाहेब जगन्नाथ राजमल पाटील, तसेच गावातील नागरिक विनोद कैलास पाटील, सागर सुरेश पाटील, विनोद रूपसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दिपक पाटील यांच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचा किरण दिसत असून, आता निसर्डी धरणाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


