ज्ञान आणि समाजसेवा या माध्यमातून बदल घडवण्याचे आवाहन – डॉ. डिगंबर महाले विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
ज्ञान आणि समाजसेवा या माध्यमातून बदल घडवण्याचे आवाहन – डॉ. डिगंबर महाले
विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरमध्ये झालेल्या प्रेरणा पर्व सन्मान सोहळ्याचे उद्घाटन करताना डॉ. डिगंबर महाले यांनी आपले मनोगत प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडले. त्यांनी सांगितले की शिक्षण आणि माहितीचा खरा हेतू समाजात सुधारणा घडवणे आणि लोककल्याण साधणे आहे. पत्रकारिता आणि माहिती प्रसारित करताना केवळ तथ्ये नव्हे, तर सामाजिक जबाबदारी देखील अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यांनी उपस्थितांना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे; त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सजग, विवेकपूर्ण आणि नैतिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. माहिती ही शक्तिशाली आहे, पण ती योग्य हेतूने वापरणे गरजेचे आहे.”
डॉ. महाले यांनी शैक्षणिक मूल्य, सामाजिक जबाबदारी, संस्कार आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर भर दिला. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना सकारात्मक बदल घडवण्यासाठी सजग राहण्याची प्रेरणा दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिक आपल्या जबाबदारीत सजग राहून समाजाला समृद्ध करू शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविवर्य प्रा. बी. एन. चौधरी (धरणगाव) यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून डॉ. डिगंबर महाले (अध्यक्ष – मंगळग्रह सेवा संस्था) उपस्थित होते.
व्यासपीठावर मा. कपिल पवार (उपआयुक्त, आदिवासी विकास विभाग), डॉ. जयदीप दादा पाटील (अध्यक्ष, नोबेल फाऊंडेशन), डॉ. अविनाश जोशी (अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ), डिवायएसपी वासुदेव देसले, मयूर पाटील (वरिष्ठ प्रबंधक, युनियन बँक), विजयसिंह पवार (सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक) शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात ईश्वर महाजन सर यांनी मराठी लाईव्ह न्युजचा सहा वर्षांचा खडतर पण प्रेरणादायी प्रवास मांडला. “पत्रकारिता ही समाजातील सकारात्मकता पेरण्याचं माध्यम आहे; प्रत्येक सन्मान ही प्रेरणेची बीजं आहेत,” असे ते म्हणाले.
कपिल पवार यांचे प्रेरणादायी मनोगत
मा. कपिल पवार यांनी आपल्या मनोगतात अत्यंत आत्मचिंतनशील विचार मांडले. “जीवनात काही काळ स्वतःसाठी थांबून स्वतःवर गुंतवणूक करणे गरजेचे आहे,” असे सांगून त्यांनी लँडमार्क फोरम कोर्स मधून मिळालेल्या जीवनशिक्षणाचा अनुभव मांडला.
“आपण अनेकदा इतरांना खूश ठेवण्यासाठी स्वतःला विसरतो, अपेक्षांमध्ये जगतो. पण स्वतःसाठी वेळ दिला नाही तर सामाजिक कार्यात स्थैर्य राहत नाही. म्हणून ध्यान, व्यायाम आणि आत्मपरीक्षण हीच खरी प्रगती आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी कुटुंब व्यवस्थेतील ताणतणाव कमी करण्यासाठी पुढील वर्धापन दिनापासून ‘कुटुंब बंध वाढवा’ हा उपक्रम सुरू करण्याचा संकल्पही जाहीर केला.
डॉ. जयदीप दादा पाटील यांचे विचारमंथन – पत्रकारिता, समाज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
डॉ. जयदीप पाटील यांनी त्यांच्या सहज आणि ओघवत्या शैलीत समाज, पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर प्रभावी भाष्य केले. “पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची दिशा दाखवणारी शक्ती आहे. आज सोशल मीडियाने माहितीचं लोकशाहीकरण केलं, पण जबाबदारी वाढवली आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “दिवाळी आता घराघरात न राहता मोबाईलच्या स्क्रीनवर गेली आहे. रील संस्कृतीने विचारांवर अधिराज्य गाजवले आहे. म्हणून खरी दिवाळी म्हणजे अंतःकरणातील प्रकाश वाढवणे!”
त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हॉट्सअॅप स्टेटस संस्कृती, आणि युवकांच्या मोबाईल व्यसनावर गंभीर चिंतन मांडत म्हटले – “आयुष्यात श्रीमंती म्हणजे पैसा नव्हे, तर समाधानी मन हेच खरे वैभव आहे.”
त्यांचे विचार उपस्थित प्रत्येक श्रोत्याला अंतर्मुख करणारे ठरले.
इतर मान्यवरांचे मनोगत
कार्यक्रमाचे उद्घाटक व मंगळ ग्रह सेवा संस्थांनचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी प्रामाणिक पत्रकारितेची गरज अधोरेखित करत म्हटले, “आज चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धैर्य कमी झालं आहे. मराठी लाईव्ह न्युज हे ते धैर्य दाखवत आहे.”
डॉ. अविनाश जोशी यांनी खानदेशातील साहित्यिकांसाठी “खानदेश रत्न” पुरस्काराची संकल्पना मांडली.
डिवायएसपी वासुदेव देसले, मयूर पाटील, आणि विजयसिंह पवार यांनीही सामाजिक कार्य, शिक्षण, आणि नात्यांच्या संवर्धनाबाबत अर्थपूर्ण विचार मांडले.
शेवटी प्रा. बी.एन. चौधरी यांनी सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी एकत्र येऊन समाजात खरे परिवर्तन घडवू शकते. त्यांनी मुलांना आणि तरुण पिढीला नेहमी सजग, सातत्यपूर्ण आणि नीतिमान राहून समाजासाठी कार्य करण्याचे महत्त्व पटवून दिले.
त्यांनी सामाजिक मूल्य, शिक्षणातील निष्ठा आणि सहकार्य यावर भर देत सांगितले की, “आपल्या कुटुंब, समाज आणि देशासाठी योग्य काम करणे हेच खरे ध्येय आहे.” प्रा. चौधरी यांचे भाषण प्रेरक, साधे आणि सर्वांसाठी विचारप्रवण ठरले.
‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार वितरण
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा मान्यवरांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कारार्थींची यादी पुढीलप्रमाणे –
1️⃣ डॉ. अविनाश रघूराज जोशी (अमळनेर) – वैद्यकीय व साहित्य क्षेत्र
2️⃣ श्री. मयूर चंद्रकांत पाटील – वरिष्ठ प्रबंधक, युनियन बँक, सामाजिक क्षेत्र
3️⃣ प्रा. डॉ. विजय तुंटे – शैक्षणिक क्षेत्र
4️⃣ सौ. अनुपमा रामेश्वर जाधव (डहाणू) – साहित्य क्षेत्र
5️⃣ डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी (ठाणे) – सामाजिक क्षेत्र
6️⃣ श्री. सुनील दयाराम महाजन – स्वेच्छानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल, सामाजिक क्षेत्र
7️⃣ श्री. दशरथ सोमा लांडगे व सौ. वसुंधरा लांडगे – आदर्श माता-पिता
8️⃣ डॉ. प्रसाद अशोक पाटील – विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी, चोपडा
9️⃣ सौ. शोभा रघुनाथ शिंदे – सामाजिक क्षेत्र
🔟 अॅड. कौस्तुभ सुनील पाटील – युवा व सामाजिक कार्य
11️⃣ अॅड. सारांश धनंजय सोनार – युवा प्रेरणा पुरस्कार
कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन
संपादक ईश्वर महाजन यांनी सर्व उपस्थित मान्यवर,मुख्याध्यापक,
पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी,जाहिरातदार व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानले. “सन्मान प्रेरणेचं बीज असतं; आणि प्रेरणा ही परिवर्तनाचं कारण ठरते,” असे सांगून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
सुत्रसंचालक सौ. वसुंधरा लांडगे यांच्या सुमधुर आवाजात राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
वैचारिक दिवाळीची मेजवानी
एकूणच, दिवाळीच्या उत्सवात विचार, संस्कृती आणि समाजप्रेरणा यांचं संगम घडवणारा हा कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी चिरस्मरणीय ठरला.
मान्यवर व रसिक श्रोत्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की —
“हीच खरी दिवाळी – मन, विचार आणि कृती उजळवणारी!”


