जानवे-मंगरूळ गटात नवा राजकीय झंझावात — दिपक पाटील आणि मातोश्री सविता ताई दोघेही रणांगणात! शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा लढणार — दिपक पाटील वाघोदेकर यांचा निर्धार
![]()
जानवे-मंगरूळ गटात नवा राजकीय झंझावात — दिपक पाटील आणि मातोश्री सविता ताई दोघेही रणांगणात!
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा लढणार — दिपक पाटील वाघोदेकर यांचा निर्धार
अमळनेर प्रतिनिधी:
जानवे मंगरूळ गटातून युवा नेतृत्व दिपक पाटील वाघोदेकर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या मातोश्री सौ. सविता ताई पाटील ह्या पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दिपक पाटील यांनी सांगितले की, “मी स्वतः जिल्हा परिषदेसाठी लढणार आहेच, पण माझ्या मातोश्री पंचायत समिती साठी उभ्या राहतील. आमचा उद्देश सत्ता नाही, तर शेतकऱ्यांचे हक्क आणि विकास आहे.”
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, कै. धनगर अर्जून पाटील यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले निसर्डी धरण हे त्या काळातील दूरदृष्टीचे प्रतीक होते. “आजपर्यंत त्या धरणाच्या दुरुस्तीला आणि विकासाला कुणीच प्राधान्य दिले नाही. पांझरा नदीचे पाणी त्या धरणात आणण्याची योजना होती, पण काही स्वार्थी राजकारण्यांनी त्या प्रकल्पाला घोटाळ्याच्या गर्तेत ढकलले,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दिपक पाटील म्हणाले, “कै. अर्जून पाटील यांनी जसा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हितासाठी लढा दिला, तसाच लढा आम्ही देखील त्यांच्या वारशातून देऊ. आमचे ध्येय विकास, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास आहे.”
या घोषणेमुळे जानवे-मंगरूळ गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, युवा पिढी दिपक पाटील यांच्या मागे एकवटताना दिसत आहे.
“वारसा विकासाचा, लढा जनतेच्या हक्कांचा!”

